शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) माजी नगरसेवक आणि गटनेते पृथ्वीराज सुतार, संजय भोसले आणि अश्विनी भोसले यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश
.
यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, भाजप हे जगातील सर्वात मोठे संघटन असून, आम्ही केवळ निवडणुकीसाठी नव्हे, तर वर्षभर काम करतो. जे लोक भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत आणि पक्षविस्तारासाठी ज्यांची आम्हाला गरज आहे, त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल. भाजप हा कार्यकर्त्यांना जपणारा पक्ष असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्यात अनेक विकासकामे झाली आहेत.
मोहोळ यांनी पुढे सांगितले की, सुतार आणि भोसले हे दोघे अनेक वर्षांपासून शहराच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात कार्यरत आहेत. भाजप आणि शिवसेनेची अनेक वर्षांपासून युती होती आणि त्यांनी राजकीय हिंदुत्ववादी वारसा जपला आहे. हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी आणि विकसित भारताच्या संकल्पनेसाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. संजय भोसले यांनी वर्षानुवर्षे कट्टर शिवसैनिक म्हणून येरवडा परिसरात काम केले असून, ते तीन वेळा नगरसेवकही होते.
या पक्षप्रवेशावेळी खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, सरचिटणीस सुशील मेंगडे, पुनीत जोशी, रवींद्र साळगावकर, प्रियांका शेंडगे, अमोल कविटकर आदी उपस्थित होते.
शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पृथ्वीराज सुतार, संजय भोसले आणि अश्विनी भोसले यांचे भाजपमध्ये स्वागत केले. ते म्हणाले की, मनपात आम्ही अनेक वर्षे सोबत काम केले आहे आणि हिंदुत्वाचा धागा कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर विश्वास ठेवून संबंधित व्यक्ती पक्षात आल्या आहेत. शिवसेनामध्ये काम करत असताना त्यांना जे प्रेम आणि आपुलकी मिळाली, त्यापेक्षा अधिक स्थान आम्ही देऊ. या प्रवेशामुळे त्यांच्या मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार असून, मनपावर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी आपण सज्ज होऊ.
संजय भोसले म्हणाले, मागील दोन निवडणुकीत आम्ही आघाडीचा धर्म पाळला. ज्या काँग्रेसचा विरोध कायम केला पण आघाडी मध्ये त्यांच्या सोबत काम केले.मात्र, आम्हाला लोकांनी शिव्या घातल्या आहे.नंतर काँग्रेसने आघाडी धर्म पाळला नसून काँग्रेसने येरवडा परिसरात निवडणुकीस तीन जागा सोडल्या नाही. भाजप सोबत आम्ही २५ वर्ष एकत्रित काम केले. त्यांची साथ सोडल्यावर आम्हाला दुःख होते. काँग्रेस आघाडी धर्म पाळत नाही. भाजप हिंदुत्ववादी पक्ष असून त्याकरिता आम्ही आज पक्षप्रवेश केला आहे.
पृथ्वीराज सुतार म्हणाले, ४० वर्षापासून आम्ही हिंदुत्व मुद्द्यावर कोथरूड परिसरात आम्ही काम करतो आहे. पंतप्रधान मोदी यांनी हिंदुत्व मुद्द्यावर देशवासी एकत्र केले असून विकासाच्या मार्गावर ते सर्वांना घेऊन जात आहे त्यामुळे आज आम्ही पक्ष प्रवेश करत आहे.

