![]()
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. मतपत्रिकेवरील उमेदवारांच्या नावांच्या क्रमाबाबत हा बदल असून, याबाबतचा अध्यादेशही जारी करण्यात आला आहे. यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतपत्रिका लोकसभा
.
या नवीन अध्यादेशानुसार, मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावांचा क्रम राष्ट्रीय पक्ष, त्यानंतर राज्यस्तरीय पक्ष, त्यानंतर राष्ट्र व राज्य या दोन्ही स्तरांवरील अमान्यताप्राप्त पक्ष आणि सर्वात शेवटी अपक्ष उमेदवार असा निश्चित करण्यात आला आहे. पक्षीय उमेदवारांमध्ये कोणत्या पक्षाच्या उमेदवाराचे नाव वर असेल, हे पूर्वीप्रमाणेच मराठी वर्णमालिकेनुसार ठरवले जाईल. यामध्ये प्रथम आडनाव (आडनाव नसल्यास नाव), त्यानंतर नाव आणि शेवटी पत्ता विचारात घेतला जाईल.
यापूर्वीच्या निवडणुकीत नावांचा क्रम केवळ त्या-त्या मतदारसंघातील एकूण उमेदवारांच्या नावांप्रमाणे असायचा. चिन्ह वाटप झाल्यानंतर तयार होणाऱ्या यादीनुसारच मतपत्रिकेवर क्रम उमटत असे. यामुळे अनेकदा अपक्ष उमेदवारांची नावे मतपत्रिकेत अग्रभागी येत असत, तर पक्षीय उमेदवारांची नावे कधी खाली, कधी मध्ये, तर वर्णमालेच्या निकषात बसल्यास कधीतरीच वर येत होती.
आता मात्र पक्षीय उमेदवारांच्या नावांना प्राधान्य मिळाल्याने त्यांचीच नावे मतपत्रिकेत अग्रभागी राहतील, हे निश्चित झाले आहे. या बदलासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६२ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीत याच बदलानुसार उमेदवारांना मतपत्रिकेत स्थान दिले जाईल.
यावेळच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या मतपत्रिकेसाठी पांढऱ्या रंगाचा कागद वापरला जाईल, तर पंचायत समितीची मतपत्रिका गुलाबी रंगाच्या कागदावर तयार केली जाईल.
नावांचा क्रम खालीलप्रमाणे असेल:
१. भारत निवडणूक आयोगाद्वारे मान्यताप्राप्त पक्ष
२. राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेले मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष
३. महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्ष
४. आयोगाने मान्यता दिलेले इतर राज्यातील राज्यस्तरीय पक्ष
५. राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी झालेले अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष
६. अपक्ष उमेदवार
