![]()
ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार रिकी केज यांनी सध्याच्या चित्रपट संगीतावर परखड मत व्यक्त केले आहे. गेल्या दहा वर्षांत असे कोणतेही चित्रपट संगीत निर्माण झाले नाही, जे दीर्घकाळ टिकेल, असे ते म्हणाले. सध्याची गाणी केवळ ‘ट्रेंडिंग’ असून, तीन महिन्यांनंतर
.
केज यांनी पुणे पुस्तक महोत्सवातील ‘लिट फेस्ट’मध्ये ‘फ्रॉम ग्रॅमी गोल्ड टू ग्रीन अर्थ’ या कार्यक्रमात संवाद साधला. प्रियांशी शर्मा यांनी त्यांच्याशी संवाद साधला, तर पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यावेळी उपस्थित होते. ९० च्या दशकातील किंवा त्यानंतरच्या दशकातील ए. आर. रहमान आणि इतर संगीतकारांची गाणी आजही लोक गुणगुणतात, हेच त्या संगीताचे खरे यश आहे, असे केज यांनी नमूद केले.
सध्या बाजारात अनेक संगीत ॲप्लिकेशन्स उपलब्ध असली तरी, त्यावर भारतीय दर्जेदार संगीत सहज उपलब्ध होत नाही, असे केज म्हणाले. ही ॲप्स सोशल मीडिया अल्गोरिदमवर आधारित असल्याने, लोकांनी चांगल्या संगीताचा शोध घेतला पाहिजे, जेणेकरून अल्गोरिदम त्यानुसार सेट होईल, असे आवाहन त्यांनी केले.
कलाकारांनी आपल्या कलाकृतीकडे केवळ स्वतःच्या दृष्टिकोनातून न पाहता, इतरांच्या नजरेतून पाहण्याची कला अवगत करावी. केवळ कलाकार असण्याबरोबरच व्यावसायिक आणि नेतृत्व क्षमता असणेही महत्त्वाचे आहे. कलेच्या व्यासपीठावर विविध घटकांना एकत्र घेऊन काम करावे लागते, यासाठी इतर कौशल्यांचीही गरज असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
शालेय शिक्षणात संगीत अनिवार्य करण्याची शिफारस रिकी केज यांनी केली. शाळेत अनेक विषय शिकवले जातात, त्यापैकी काही निवडक विषयांत विद्यार्थी करिअर करतात. इतर शिक्षण वाया जात नाही, त्याचप्रमाणे संगीत शिक्षण अनिवार्य केल्यास काही विद्यार्थी संगीतात करिअर करतील, तर अनेक चांगले संगीत श्रोते तयार होतील, असे ते म्हणाले. चांगल्या संगीतासाठी चांगले श्रोते असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
