शिव्या थांबवा,श्वास वाचवा—राहुल गांधींची सरकारला नाकारता येणार नाही अशी समज 


वंदे मातरम आणि निवडणूक सुधारणा या विषयांवर झालेल्या चर्चांनी भारतीय जनता काय चालले आहे हे डोळ्यांनी पाहिलेच आहे. मजेची गोष्ट म्हणजे, या दोन्ही चर्चा घडवून आणताना सरकारच स्वतःच्या पायावर धोंडा पाडून बसले,असे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी म्हणाले. इतकेच नव्हे, अमित शहा यांनी तर लोकसभेत शिवीगाळ केली, कारण ते “मेंटली डिस्टर्ब” आहेत, असेही त्यांनी टोमणे मारत सांगितले. सहसा असंसदीय भाषा टाळणारे राहुल गांधी यावेळी जणू भाजपच्या भाषाशैलीतच उतरले की काय, असा संशय यावा अशी परिस्थिती निर्माण झाली.

पण याहून गंभीर मुद्दा म्हणजे, देशातील आणि विशेषतः मोठ्या शहरांतील प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास, कर्करोगासारख्या आजारांचे वाढते प्रमाण, लहान मुलांचे आजारपण आणि त्यांना श्वास घेणेही अवघड होणे,या प्रचंड संकटावर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसून चर्चा करणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. हा विषय कुठल्याही एका पक्षाचा नसून सर्वांच्याच जिवावर बेतलेला आहे. सत्ता आणि विरोध हे वेगळे विषय असले तरी प्रदूषणासारख्या प्रश्नावर मतभेदाचा दिखावा करण्याची परवड आता कुणालाच नाही.

 पत्रकार आशिष चित्रे आणि हेमंत अत्री या विषयावर बोलत होते की, वंदे मातरम आणि निवडणूक सुधारणा या दोन्ही मुद्द्यांवर काँग्रेसने सरकारला अक्षरशः भिंतीला खिळवले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी सर्व काँग्रेस खासदारांना बोलावून त्यांचे कौतुकही केले आणि स्पष्टपणे सांगितले,या दोन चर्चांमध्ये आम्ही सरकारला कोपर्‍यात पकडले आहे.

काँग्रेस “पार्ट-टाइम” पक्ष असल्याच्या आरोपावरही त्यांनी टोला लगावला. “राहुल गांधी विदेशात असतात म्हणून काँग्रेस कमकुवत” असा आरोप केला जातो. पण या दोन चर्चांमध्ये केवळ राहुल गांधी नव्हे, तर संपूर्ण काँग्रेसनेच सरकारला चांगलेच ‘धुतले’, हे आता सरकारलाही पचवणे कठीण गेले आहे. सरकारकडे संख्याबळ आहे, पण तात्विक चर्चा करणारा एकही माणूस नाही. उरते ते फक्त घाणेरडे बोलणे आणि आपणच शहाणे असल्याचे दाखवण्याचा हास्यास्पद प्रयत्न.

पंधरा डिसेंबरला राहुल गांधी जर्मनीत मोठ्या संमेलनासाठी जाणार आहेत, तिथेही ते प्रदूषणाचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गंमत म्हणजे, राहुल गांधी विदेशात गेले की पाप, आणि पंतप्रधान मोदी विदेशात गेले की “विश्वगुरू” ही दुटप्पी व्याख्या मात्र सरकारने थोडी तरी सुधारावी.

राहुल गांधींनी आज प्रदूषणाचा मुद्दा काढून एक नवीनच कार्यक्रम लावला. कारण त्यांनी काही शब्द उच्चारले की त्या मुद्द्याचा विरोध करणे हा सरकारचा स्थायीभाव जणू ठरलेला. पण सरकारने या विषयावर चर्चा करण्यास संमती दिली. याचा अर्थ, हा मुद्दा निव्वळ योग्य नसून राहुल गांधींचा आणखी एक राजकीय विजय आहे.

वंदे मातरमच्या चर्चेत सरकारने किती खोटारडेपणा केला हे देशातील प्रत्येक युवकाला आता स्पष्ट झाले आहे. भाजपा ज्या कृत्रिम राष्ट्रवादावर स्वार होते, तोही या चर्चेत पूर्णपणे उघड पडला. गेली अकरा वर्षे एकाच पद्धतीने ओरडणारे हे लोक, आता राहुल गांधींच्या मुद्द्यांनाही उत्तर देताना गोंधळले आहेत.

राहुल गांधी म्हणाले की, शहरांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने ठोस, नियोजनबद्ध आराखडा तयार करावा. “आम्ही तुम्ही मागे काय केले ते विचारणार नाही, आणि आवश्यक तिथे आम्ही तुमचा पाठिंबा देऊ,” असे स्पष्ट सांगून त्यांनी सरकारसमोर आरसा ठेवला. पुढील पाच–दहा वर्षांत संपूर्ण प्रदूषणमुक्ती शक्य नाही, परंतु दिशादर्शक पावले उचलणे मात्र आवश्यकचअसेही त्यांनी नोंदवले.

भारतीय जनता कायमच सरकार–विरोधकांच्या भांडणाकडे बघत राहते. पण प्रदूषणाचा मुद्दा असा आहे की ज्यावर दोन्ही बाजूंनी एकत्र येऊन काम केले पाहिजे,हे राहुल गांधींनी विशेषत्वाने सांगितले. संसदेत सुद्धा या विषयावर गंभीर आणि सभ्य चर्चा व्हावी, शिवीगाळीचे अखाडे उभे करण्याऐवजी जनतेच्या भल्यासाठी काम व्हावे, अशी त्यांनी सरकारला आठवण करून दिली.शेवटी, राहुल गांधी यांनी मांडलेला मुद्दा केवळ योग्य नव्हे तर प्रशंसनीय आहे कारण हा मुद्दा पुढील पिढ्या वाचवण्याचा आहे, राजकारण वाचवण्याचा नाही.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *