न्यायालयाचे आदेशावरून कनेरगाव येथील अतिक्रमण जमीनदोस्त:30 वर्षांच्या पाठपुराव्याला यश, मूळ मालकाला मिळाला ताबा
![]()
हिंगोली तालुक्यातील कनेरगाव येथे सुमारे 3000 स्क्वेअर फुट पेक्षा अधिक जागेवर बळजबरीने करण्यात आलेले अतिक्रमण न्यायालयाच्या आदेशावरून पोलीस बंदोबस्तात हटविण्यात नुकतेच हटविण्यात आले आहे. सदरील जागेचा तबा मुळ मलकाला मिळाला आहे. यानंतर आता बळजबरीने इतरांच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे याबाबत अधिक माहिती अशी की हिंगोली येथील जितेंद्र साहू यांच्या वडिलांनी तालुक्यातील कनेरगाव नाका येथे सुमारे 3000 स्क्वेअर फूट पेक्षा अधिक जागा खरेदी केली होती. या जागेवर सुमारे 30 वर्षांपूर्वी त्यांनी लहान मोठा व्यवसाय सुरू केला होता. हिंगोली येथून कनेरगाव नाका येथे जाऊन व्यवसाय करावा लागत होता. मात्र वृद्धापकाळाने पुढे त्यांना त्या ठिकाणी व्यवसाय करता आला नाही. या जागेकडे कोणाचेही लक्ष नाही असे गृहीत धरून कनेरगाव नाका येथील गावंडे कुटुंबाने अतिक्रमण करून बळजबरीने जागेचा ताबा घेतला होता. त्या ठिकाणी त्यांनी पक्के घर बांधले होते तर खाली आठ ते दहा दुकाने काढून भाडेतत्त्वावर देखील दिली होती. मात्र सदर जागा आपल्या मालकीची असल्याचे जितेंद्र साहू कुटुंबीयांनी कनेरगाव ग्रामपंचायतला कळविले होते. मात्र त्याकडे ग्रामपंचायतने दुर्लक्ष केले. त्यामुळे साहू कुटुंबीयांनी हिंगोलीच्या न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर साहू कुटुंबाच्या हक्कात निकाल दिला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतरही अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यानंतर साहू कुटुंबीयांनी तीस वर्ष पाठपुरावा करून अखेर न्यायालयाच्या आदेशावरून पोलीस बंदोबस्तात बळजबरीने केलेला ताबा हटविण्यात आला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी पक्के निवासस्थान देखील बांधण्यात आले होते. जेसीबीच्या साह्याने सदरील निवासस्थान पाडण्यात आले. त्यामुळे उशिरा का होईना साहू कुटुंबियांना न्याय मिळाला आहे. याशिवाय इतरांच्या जागेवर बळजबरीने अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
