विधान परिषदेत 150 कोटींचा घोडेबाजार; संजय राऊतांच्या आरोपाने राजकारणात खळबळ:माघार नाट्यामागे पैशांचा खेळ?

0
730-x-548-new-2026-05-07t121332124_1780634284.jpg




महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. राज्यातील 17 जागांसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत 5 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 12 जागांवर आता थेट लढती रंगणार आहेत. मात्र या सर्व घडामोडींनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. बिनविरोध निवडीसाठी आणि उमेदवारांच्या माघारीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संजय राऊत यांनी समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया देताना माघार प्रक्रियेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी दावा केला की, बिनविरोध निवडीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये आणि उमेदवारांना माघार घ्यायला लावण्यासाठी झालेल्या राजकीय हालचालींमध्ये एका दिवसात किमान 150 कोटी रुपये खर्च झाले. विरोधी पक्षातील काही उमेदवारांनी स्वतःचा भाव ठरवून व्यवहार केल्याचा आरोपही त्यांनी केला. कोकण, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे झालेल्या घडामोडी लोकशाहीसाठी घातक असल्याचे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, अर्ज माघारीनंतर राज्यातील 5 जागा बिनविरोध झाल्या आहेत. या जागांमध्ये महायुतीने मोठे यश मिळवले असून दोन जागांवर शिवसेना शिंदे गट, दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि एका जागेवर भाजपचा विजय निश्चित झाला आहे. त्यामुळे मतदानाआधीच महायुतीने काही मतदारसंघांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केल्याचे चित्र दिसत आहे. या बिनविरोध निवडींमुळे अनेक ठिकाणी राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. संजय राऊत यांची पोस्ट देखील पहा…. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले. ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने हा मार्ग मोकळा झाला. या निर्णयानंतर पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या आरोपावरून बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पुणे मतदारसंघात महाविकास आघाडीचे श्रीकांत पाटील आणि भाजपचे बंडखोर प्रदीप कंद यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादीचे विक्रम काकडे यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला. ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजित पवार यांनी अर्ज मागे घेतल्याने शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र फाटक यांचा मार्ग सुकर झाला. विधान परिषद निवडणुकीभोवतीचे राजकारण अधिकच तापले याशिवाय यवतमाळ मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध विजयी झाले. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघात काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे अरुण लखानी यांची निवड निश्चित झाली. अशा प्रकारे 5 जागांवरील निकाल मतदानाआधीच स्पष्ट झाले आहेत. मात्र या सर्व माघारी आणि बिनविरोध निवडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी केलेल्या 150 कोटी रुपयांच्या कथित व्यवहारांच्या आरोपांमुळे विधान परिषद निवडणुकीभोवतीचे राजकारण अधिकच तापले असून पुढील काही दिवसांत या आरोपांवर सत्ताधारी पक्षांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *