'लाडकी बहीण' योजनेतील अपात्र प्रस्तावांची होणार फेरतपासणी:पालकमंत्र्यांची ग्वाही, समिती स्थापन; पात्र महिलांना मिळणार न्याय
![]()
‘लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र ठरलेल्या प्रस्तावांची आता फेरतपासणी केली जाणार आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. यासाठी सरकारने एक समिती गठीत केली असून, पात्र महिलांना त्यांचे लाभ मिळतील अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. या योजनेत मोठ्या संख्येने महिला अपात्र ठरल्याने त्यांच्या प्रस्तावांची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरात सुमारे ८० लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील नेमका आकडा अद्याप स्पष्ट नसला तरी, तो काही लाखांमध्ये असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. योजना सुरू झाली तेव्हा अमरावती जिल्ह्यातून सुमारे ८ लाख महिलांनी अर्ज केले होते. त्यापैकी ६ लाख ५० हजार महिलांना सुरुवातीला पात्र ठरवून त्यांना दरमहा १५०० रुपये दिले जात होते. मात्र, दरम्यानच्या काळात ‘केवायसी’ (KYC) प्रक्रिया आणि सखोल तपासणी करण्यात आली, ज्यात अनेक महिला अपात्र ठरल्या. यामुळे अनेक महिलांनी आपण पात्र असूनही अपात्रतेच्या यादीत कसे आलो, असा प्रश्न उपस्थित करत लोकप्रतिनिधींकडे विचारणा केली आहे. पालकमंत्र्यांनी फेरतपासणीची ग्वाही दिली असली तरी, सरकारने स्थापन केलेली समिती कधीपासून काम सुरू करणार, फेरतपासणी किती दिवसांत पूर्ण होईल आणि गोठवलेले लाभ पूर्ववत कधी मिळतील, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अपात्र ठरण्याचे काही प्रमुख निकष खालीलप्रमाणे आहेत: – कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त असणे. – कुटुंबातील एखादा सदस्य आयकर दाता (प्राप्तीकर भरणारा) असणे. – अर्जदार महिलेच्या कुटुंबातील सदस्यांकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) असणे. – कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरीत किंवा निवृत्तीवेतनधारक असणे. – बँक खाते आधार कार्डशी लिंक नसणे किंवा ‘डीबीटी’ (DBT) पर्याय सक्रिय नसणे.
