मित्रांनीच केला मित्राचा घात!:परळीत पैशांच्या वादातून 36 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, 48 तासांत पोलिसांकडून छडा
![]()
बीड जिल्ह्यातील परळी येथे रेल्वे रुळावर एका 36 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने सुरुवातीला हा आत्महत्या किंवा रेल्वे अपघाताचा प्रकार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, बीड पोलिसांनी या प्रकरणाचा अत्यंत कौशल्याने तपास करत अवघ्या 48 तासांत या भीषण खुनाचा उलगडा केला असून, केवळ पैशांच्या देवाणघेवाणीतून झालेल्या वादातून या तरुणाची हत्या करण्यात आल्याचे आता निष्पन्न झाले आहे. परळी शहरातील सरदारनगर भागात राहणाऱ्या अफजलखान ऊर्फ तोहीद पठाण (वय 36) या तरुणाची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याचेच जवळचे मित्र असणाऱ्या ऋषिकेश फड आणि गौरव व्यास यांना बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच, त्यांनी कट रचून हा खून केल्याची कबुली दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मित्रांसोबत बाहेरगावी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडलेल्या अफझलखानचा सलग दोन दिवस कुटुंबीयांशी कोणताही संपर्क झाला नव्हता. त्यामुळे सर्वजण चिंतेत असतानाच, दोन दिवसांनंतर परळीतील लेंडेवाडी शिवारातील रेल्वे रुळावर अचानक त्याचा मृतदेह आढळून आल्याने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आरोपींचे उडवाउडवीची उत्तरे सुरुवातीला घटनास्थळाची परिस्थिती पाहता हा रेल्वे अपघात किंवा आत्महत्येचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, परळी पोलिसांना यात घातपाताचा संशय आल्याने त्यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अफझलचे जवळचे मित्र ऋषिकेश फड आणि गौरव व्यास या दोघांना ताब्यात घेतले. परंतु सुरुवातीला या दोन्ही आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता, या दोघांवरील संशय अधिकच बळावला. याच भक्कम तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी दोन्ही संशयितांना आपला पोलिसी खाक्या दाखवताच, त्यांनी जास्त काळ तग न धरता या गुन्ह्याची कबुली दिली. पैशांच्या वादातून दगडाने ठेचून संपवले ऋषिकेश फड आणि गौरव व्यास या दोन मित्रांनी पैशांच्या देवाणघेवाणीवरून पूर्वनियोजित कट रचून अफझलला बाहेरगावी जाण्याच्या बहाण्याने एका निर्जन स्थळी नेले. तिथे त्याच्या डोक्यात आणि अंगावर दगडाने जबर मारहाण करून त्याचा खून केला आणि त्यानंतर हा प्रकार अपघात किंवा आत्महत्या भासवण्यासाठी त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर आणून फेकला. परळीत खळबळ या गंभीर घटनेचा बीड पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत अवघ्या 48 तासांत छडा लावला. घटनास्थळाची परिस्थिती पाहून पोलिसांना घातपाताचा संशय आल्याने त्यांनी तातडीने सूत्रे हलवून अफझलचे मित्र ऋषिकेश आणि गौरव यांना ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या आरोपींचे बिंग परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणातून फुटले. या भक्कम पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, मित्रांनीच केलेल्या या भयंकर विश्वासघातामुळे परळी शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
