विषारी दारू प्रकरणी कारवाईची मागणी:आमदार अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; ती मानवी हत्याच असल्याचा केला आरोप

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-06-04t183429813_1780578341.jpg




हडपसर, फुगेवाडी आणि दापोडी परिसरातील विषारी दारू प्रकरणात मृत्यू झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा तसेच संबंधित पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि पोलिस महासंचालकांना पत्राद्वारे केली आहे. अवैध दारूविक्रीचे अड्डे वर्षानुवर्षे सुरू असताना संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केले आहे. या प्रकरणात मुख्य आरोपींसह संबंधित पोलिस व उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांवरही खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी दानवे यांनी केली आहे. विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, प्रकरणाचा जलदगती न्यायालयात खटला चालवावा आणि मिथेनॉलसारखे घातक रसायन राज्यात कसे पोहोचले याचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी दानवे यांनी पत्रातून केली आहे. सदरील घटनेतील मृत्यू फक्त विषारी दारूमुळे घडलेले नसून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे झालेली मानवी हत्या असल्याचा आरोप करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. वृक्षारोपण निविदांतील कथित अनियमिततेची चौकशी करा तर, वृक्षारोपण व संगोपन कामांच्या निविदा प्रक्रियेत कथित अनियमितता झाली असून अंबादास दानवे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे चौकशीची मागणी केली आहे. छत्रपती संभाजीनगर व जालना विभागातील वृक्षारोपण व संगोपन (ट्री प्लांटेशन अँड नर्चरिंग) कामांच्या निविदांमध्ये रेनबो ग्रीनर्स या संस्थेला पात्र ठरविण्यात आले आहे. संबंधित निविदांमध्ये प्रत्यक्ष काम पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी नमूद असताना, क्यूआर आधारित बिड कॅपॅसिटी निश्चित करताना कोणता कालावधी ग्राह्य धरण्यात आला, तसेच संस्थेला तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरविताना कोणत्या कागदपत्रांचा आधार घेण्यात आला, याची माहिती जाहीर करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे. संपूर्ण निविदा प्रक्रियेची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित निविदांवरील पुढील प्रशासकीय कार्यवाही स्थगित ठेवण्याचा विचार करावा, अशी मागणीही दानवे यांनी केली आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, असेही अंबादास दानवे यांनी पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *