मुंबई-गोवा महामार्ग अर्धवटच!:मंत्री नितीन गडकरींनी दिलेली डेडलाइन हुकली; टोल सुरू केल्याने प्रवाशांचा संताप
![]()
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाची वर्षानुवर्षे प्रतीक्षा करणाऱ्या कोकणवासीयांच्या पदरी पुन्हा एकदा घोर निराशा पडली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी माजी खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील वाढदिवस सोहळ्यात, यंदाच्या पावसाळ्यापूर्वी म्हणजेच 31 मे पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे ठाम आश्वासन दिले होते. मात्र, जून महिना सुरू झाला तरी महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत रखडले असून, गडकरींनी दिलेली ही डेडलाईन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे महामार्गाचे काम अपूर्ण असताना, दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने या मार्गावर प्रवाशांकडून टोल वसुली सुरू केल्याने कोकणकरांच्या संतापात अधिकच भर पडली आहे. पूर्ण रस्त्याअभावी टोलचा भुर्दंड का सोसावा, असा सवाल नागरिक विचारत आहेत. डेडलाईन हुकल्यामुळे आता यंदाचा पावसाळा देखील कोकणवासीयांना आणि प्रवाशांना याच खडतर, धोकादायक आणि खड्डेमय महामार्गावरून प्रवास करत काढावा लागणार हे निश्चित झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 2011 पासून, म्हणजेच तब्बल 15 वर्षांपासून सुरू आहे. या दीर्घ काळात अनेक नामांकित कंपन्या आणि कंत्राटदार बदलूनही हा महामार्ग अद्याप पूर्ण होऊ शकलेला नाही. एकीकडे रस्त्याचे काम अपूर्ण असताना, दुसरीकडे खारपाडा येथे पहिला टोल सुरू करून प्रवाशांकडून वसुली सुरू करण्यात आली आहे. कोकणवासीयांनी या टोल वसुलीला कडाडून विरोध करूनही, प्रशासनाने जनभावनेला वाटाण्याच्या अक्षता लावत खारपाडा येथील टोल सुरूच ठेवल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. कोणत्या भागात रखडली कामे? मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा सर्वाधिक आणि थेट फटका रायगड जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेला बसत आहे. या जिल्ह्यातील अपूर्ण कामांमुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून, अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या माणगाव आणि इंदापूर या दोन्ही शहरांच्या बाह्यवळण रस्त्यांचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. या दोन्ही बायपासचे मिळून साधारण 10 किलोमीटर अंतराचे मुख्य रस्त्याचे काम आजही प्रलंबित असल्याने, या मार्गावर सातत्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे. प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल बायपास व्यतिरिक्त इतर पायाभूत सुविधांची अवस्थाही अत्यंत निराशाजनक आहे. कोलाड परिसरातील उड्डाणपुलाचे काम अजूनही रखडलेल्या स्थितीत आहे. याशिवाय, महामार्गावरील उड्डाणपुलांखालील गावांना जोडणारे सर्व्हिस रस्ते आणि अनेक भागांतील अंतर्गत रस्त्यांची कामेही अपूर्ण असल्यामुळे, स्थानिक नागरिकांना आणि महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दररोज मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. डेडलाइन कोणत्या आधारवार दिली? स्थानिकांचा संतप्त सवाल रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाचे एकूण 140 किलोमीटरचे जाळे असून, अधिकृत आकडेवारीनुसार यापैकी केवळ 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 30 टक्के काम अद्यापही प्रलंबित असल्यामुळे अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे, ज्यामुळे अपघातांचा धोका लक्षणीयरीत्या वाढला आहे. महामार्गावरील उड्डाणपूल, सर्व्हिस रस्ते आणि अत्यंत महत्त्वाचे बायपास अपूर्ण अवस्थेत असताना, संबंधित मंत्री महोदयांनी 31 मे पर्यंत काम पूर्ण करण्याची डेडलाईन नेमकी कोणत्या आधारावर दिली होती, असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक आणि कोकणात जाणारे प्रवासी विचारत आहेत. पावसाळ्यात कोकणवासीयांचा प्रवास यंदाही खडतरच दरवर्षी पावसाळा जवळ आला की महामार्ग पूर्ण करण्याच्या केवळ आश्वासनांची खैरात केली जाते. मात्र जमिनीवरील प्रत्यक्ष परिस्थिती तशीच विदारक राहते, अशी तीव्र संतापाची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे. आता जून महिना सुरू झाल्याने पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. अशा गंभीर परिस्थितीत हे अर्धवट रस्ते आणि अपूर्ण सर्व्हिस रस्ते यामुळे यंदाचा पावसाळ्यातील प्रवास कोकणवासीयांसाठी सुखकर होण्याऐवजी अधिकच खडतर आणि त्रासदायक ठरणार, अशी मोठी भीती आता व्यक्त केली जात आहे.
