राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात केला:श्रीकांत पाटलांच्या माघारीनंतर कॉंग्रेसचा गंभीर आरोप, प्रशांत जगतापांची जोरदार टीका
![]()
पुण्यातील विधानपरिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उमेदवार श्रीकांत पाटील यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काकडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या घडामोडीवर काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये दाखल झालेले काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसने ही जागा स्वतः न लढवता राष्ट्रवादीवर विश्वास ठेवून त्यांना सोडली होती. मात्र आता त्यांच्या उमेदवाराने अचानक माघार घेतल्यामुळे हा आमचा मोठा विश्वासघात असल्याची टीका जगताप यांनी केली आहे. प्रशांत जगताप म्हणाले, पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकूणच जे काही विरोधक आहेत, त्यांची भाजप किंवा महायुती सरकारच्या विरोधात लढण्याची तयारी होती. इथे आमच्या काँग्रेस पक्षाचा आकडा हा सगळ्यात मोठा होता. काँग्रेस पक्षाने या जागेवर दावा केला होता. प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्यासोबत सुद्धा या संदर्भात आमची चर्चा झाली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाने पुण्याच्या जागेवर दावा केला आणि महाराष्ट्रातल्या 17 जागेमध्ये फक्त आम्हाला दोनच जागा द्या, पुणे आणि साताऱ्याची अशा प्रकारे मागणी केल्यामुळे, काँग्रेस पक्षाने या ठिकाणी मोठ्या मनाने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाला सोडली, असे जगताप यांनी सांगितले. आम्हाला धोका झालेला आहे पुढे बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, त्यावेळेस सुद्धा आमचे या ठिकाणी आग्रही मत होते की, या म्हणजे शिवसेना ठाकरे गट असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट, यापेक्षा कॉंग्रेस पक्षाच्या मतदारांची संख्या जास्त होती. पण दुर्दैवाने या संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाने यात आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने या ठिकाणी मोठ्या भावाच्या भूमिकेत ही जागा शरद पवार गटाला सोडली. पण या ठिकाणी आम्हाला धोका झालेला आहे, अशी टीका जगताप यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाचा हा विश्वासघात झालाय तसेच ही जागा ज्या ठिकाणी आम्ही लढून काँग्रेस, भाजपच्या विरोधामध्ये लढते हा संदेश मतदारांना देणार होती, पण दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेचा फॉर्म भरला आणि आज तो अखेर माघारी सुद्धा घेतला. हा आमचा एक विश्वासघात आहे. या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा हा विश्वासघात झालाय अशा प्रकारची या ठिकाणी आमची समजूत आहे. इथून पुढच्या काळामध्ये काँग्रेस आपल्या स्वबळावर लढण्याचा नारा निश्चित देईल, असेही प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले आहे.
