गडकरींचे टाटांना पत्र:नागपूर-मुंबई विमानसेवा पूर्ववत करण्याची मागणी, एअर इंडियाने फेऱ्या रद्द केल्याने औद्योगिक विकासावर परिणाम

0
ec920e22-e608-4327-a6e6-27947fda9217_1780382688993.jpg




केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना पत्र लिहून नागपूर-मुंबई विमानसेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. एअर इंडियाने नागपूरहून मुंबईसाठीच्या विमानांची संख्या कमी केल्याने आणि काही फेऱ्या रद्द केल्याने विदर्भाच्या औद्योगिक विकासाला बाधा येत असल्याचे गडकरींनी पत्रात म्हटले आहे. नागपूर येथील ‘असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट’ या संस्थेने विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत गडकरींकडे दाद मागितली होती. या मागणीची गंभीर दखल घेत गडकरींनी थेट टाटा समूहाच्या प्रमुखांना पत्र पाठवले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, विदर्भातील व्यापार, उद्योग, गुंतवणूक आणि प्रशासकीय कामकाजासाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे या मार्गावरील विमाने रद्द केल्याने व्यावसायिक प्रवास आणि प्रवाशांच्या सोयींवर प्रतिकूल परिणाम होत असल्याची भीती त्यांनी पत्रात व्यक्त केली. गडकरींनी पत्रात नागपूरच्या ऐतिहासिक महत्त्वाचाही उल्लेख केला. सुमारे १०० वर्षांपूर्वी टाटांच्याच मालकीखाली सुरू झालेल्या ‘नाईट एअर मेल सर्व्हिस’चे नागपूर हेच मुख्य केंद्र होते. तसेच, केंद्र सरकारने नुकतीच पीपीपी तत्त्वावर नागपूर विमानतळाच्या आधुनिकीकरणाची जबाबदारी जीएमआर समूहाकडे सोपवण्यास मंजुरी दिली आहे, ज्यामुळे नागपूर देशातील एक प्रमुख विमान वाहतूक केंद्र म्हणून विकसित होत आहे. या सर्व बाबींचा आणि विमान प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा विचार करता, प्रादेशिक कनेक्टिव्हिटी टिकवून ठेवण्यासाठी एअर इंडियाने नागपूर-मुंबई दरम्यानची किमान एक सकाळ किंवा संध्याकाळची विमान फेरी तातडीने पूर्ववत करणे आवश्यक आहे. चंद्रशेखरन यांनी या प्रकरणात तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी विनंती गडकरींनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *