भंडाऱ्यात कोणती ग्रामपंचायत मारणार बाजी?:वाशिमच्या चमूकडून जिल्ह्यात पंचायत राज अभियानाचे मूल्यांकन
![]()
17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे मूल्यांकन भंडारा जिल्ह्यात सुरू झाले असून अभियानाच्या मूल्यांकनासाठी वाशिम जिल्ह्याची चमू 1 जुन रोजी दाखल झाली आहे. या अभियानात भंडारा जिल्ह्यातील सात तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीची तपासणी केली जाणार आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागा मार्फत हे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे या तपासणी अभियान चमुचे अध्यक्ष म्हणून वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पीत चौव्हाण,तर समीती सदस्य म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शआत्माराम बोंद्रे, पाणी व स्वच्छता अभियानाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी धैर्यशील पाटील,वृत्तपत्र प्रतिनिधी यशवंत हिवराळे, पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी प्रमोद लोखंडे, यांचा समावेश आहे. या अभियानांतर्गत भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी विविध उपक्रम राबविले आहेत. आठवड्यातून एकदा लोकसहभागातून ग्राम स्वच्छता मोहीम, श्रमदानातून रस्त्यांच्या कडेला वृक्ष लागवड, शासकीय इमारतींची रंगरंगोटी करणे, सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे, मुख्य चौकांचे सौंदर्यीकरण, तक्रार पेटी लावून ग्रामस्थांच्या तक्रारींचे निवारण करणे आदी विविध उपक्रम या ग्रामपंचायतींनी राबविले आहेत. आता या ग्रामपंचायती मूल्यांकना साठी सज्ज झाल्या असून कोणती ग्रामपंचायत बाजी मारते, याकडे संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे, त्यांना स्पर्धात्मक वातावरणात नवीन ऊर्जा देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे तसेच ग्रामपंचायतीमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे हा अभियानाचा उद्देश आहे.
