मान्सूनने ईशान्य व्यापला, महाराष्ट्रात मात्र संथगतीने चाल:15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता कमी – मुख्यमंत्री

0
orig_new-project-2026-06-08t065538923_1780882013.jpg




देशात नैऋत्य मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, ३-४ दिवसांत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशाच्या आणखी काही भागांत मान्सून पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. असे असले तरीही हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर मान्सूनची वाटचाल संथगतीने होणार आहे. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपूर्वी समाधानकारक पावसाची शक्यता अत्यंत कमी असल्याचा इशारा राज्य कृषी विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालयाने रविवारी दिला आहे. महाराष्ट्रात १२ जूनपर्यंत अनेक भागांत कमाल तापमान उच्च राहू शकते. विदर्भ व खान्देशात कमाल तापमान ४० अंशापेक्षा जास्त, तर मराठवाड्यात ३५ ते ४० अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, मान्सूनने संपूर्ण नागालँड, मणिपूर, मिझोराम व आसाम-अरुणाचलचा काही भाग व्यापल्याचे हवामान विभागाने सांगितले. केरळममध्ये २४ तासांत अतिवृष्टी झाली. पुढील ७ दिवसांत केरळमसह कर्नाटक, तामिळनाडू व ईशान्य भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. विदर्भ, मराठवाड्यासाठी चिंता महाराष्ट्रात सध्या नैऋत्य मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला आहे. यामुळे ९ जूनपर्यंत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र, उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी राहील. विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात १५ जूनपर्यंत दुपारच्या वेळी ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळू शकतात. परंतु हा पाऊस व्यापक पेरणीसाठी पुरेसा नसेल. महाराष्ट्रात सर्वदूर पावसानंतरच पेरणी करा राज्यातील शेतकऱ्यांनी केवळ ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी पडणाऱ्या पावसाच्या भरवशावर पेरणीची घाई करू नये. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी चांगल्या आणि सर्वदूर पावसाची वाट पाहावी, जेणेकरून पिकांचे संभाव्य नुकसान टाळता येईल. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री राजस्थान-पंजाबमध्ये हीटवेव्ह, दक्षिणेत पावसाचा अलर्ट १. या आठवड्यात कोणत्या राज्यांना हीटवेव्हचा इशारा? देशातील अनेक भागांत सध्या उकाडा आणि उष्णता त्रासदायक ठरेल. ७ ते ११ जूनदरम्यान पश्चिम राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, यूपी आणि मध्य प्रदेशच्या काही भागांत मेघगर्जनेसह भीषण उष्णतेची लाट (हीटवेव्ह) येण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. २. डोंगराळ भागात सध्या हवामान बदलणार आहे का? होय, जम्मू-काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये ७ ते १३ जून दरम्यान तुरळक पाऊस आणि मेघगर्जनेची शक्यता आहे. ११ जूनपासून पश्चिम हिमालयीन क्षेत्रात एक नवीन ‘पश्चिमी विक्षोभ’ सक्रिय होत आहे, ज्यामुळे डोंगरांवर ४०-५० किमी/तास वेगाने सोसाट्याचा वारा वाहू शकतो. पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी. ३. दिल्ली-एनसीआरमध्ये २-३ दिवस हवामान कसे राहील? ८ आणि ९ जून रोजी आकाश मुख्यतः निरभ्र राहील आणि वेगाने गरम वारे (२०-३० किमी प्रति तास) वाहतील, ज्यामुळे कमाल तापमान ४२ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचू शकते. ४. दक्षिणेतील राज्यांमध्ये पावसाचा काय अंदाज आहे? किनारपट्टीवरील कर्नाटक, केरळ व पुद्दुचेरीच्या माहेमध्ये संपूर्ण आठवडाभर व्यापक पाऊस पडेल. ८-१० जूनदरम्यान किनारपट्टीवरील आणि अंतर्गत कर्नाटकच्या जिल्ह्यांमध्ये ‘अतिमुसळधार पावसाचा’ रेड/ऑरेंज अलर्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *