156 पैकी निम्म्याच लोकांवर कारवाई का?:इतर 78 जण आमदार, खासदारांचे मुलं होती का? 'प्रोजेक्ट एक्स'वरून रोहिणी खडसेंचा संताप
![]()
आळंदी-मरकळ रोडवरील तुळापूर येथील एका खासगी बंगल्यात सुरू असलेल्या हाय-प्रोफाइल रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे 2:30 वाजता धडक छापा टाकला. ‘प्रोजेक्ट एक्स’ नावाने आयोजित या बेकायदेशीर पार्टीतून पोलिसांनी तब्बल 107 तरुण आणि 49 तरुणींना ताब्यात घेतले आहे. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी टीका केली आहे. रोहिणी खडसे म्हणाल्या, पुण्याजवळच्या तुळापूर येथे एका पार्टीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला. पार्टीत तब्बल 156 लोक सहभागी असताना फक्त 78 जणांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातही फक्त 29 जणांची टेस्ट करण्यात आली. मला आठवतेय प्रांजल यांच्या प्रकरणात चार – पाच लोक एकत्र जमले होते. त्याला पुणे पोलिसांनी ‘रेव्ह पार्टी’चे नाव दिले होते. आता 156 लोक सापडली त्याला ‘हाऊस पार्टी’ म्हणत आहेत. 156 लोकांपैकी इतर 78 लोकांवर पुणे पोलिस मेहरबान का? प्रांजल यांच्यासह सर्वांना ताब्यात घेण्यात आले होते व सर्वांची टेस्ट करण्यात आली होती. मग आता पुणे पोलिस 156 लोकांपैकी इतर 78 लोकांवर इतकी का मेहरबान झाली? फक्त 78 लोकांवर कारवाई केली मग इतर 78 लोकांना का सोडण्यात आले? फक्त 29 लोकांचीच का टेस्ट करण्यात आली? असा सवाल उपस्थित करत यातून पुणे पोलिसांचा दुटप्पीपणा दिसत असल्याची टीका रोहिणी खडसे यांनी केली आहे. पुणे पोलिस चावी दिल्यासारखे वागतेय तसेच पुढे रोहिणी खडसे म्हणाल्या, इतर लोकांना सोडले ते काय आमदार, खासदारांचे मुलं होती का? की हाय प्रोफाइल लोक होती जी सरकारला मदत करतात? पोलिस सांगत आहेत की या पार्टीची परवानगी घेण्यात आली होती पण परवानगीचा एक साधा पेपर दाखवला जात नाही. ना अद्याप कारवाईचा एखादा व्हिडिओ समोर आला आहे. प्रांजल यांच्या प्रकरणात व्हिडिओ बाहेर पाठवले जात होते. मीडियाला माहिती पुरवून मीडिया ट्रायल चालवला जात होता. पुणे पोलिसांना कोण तरी चावी देतो तसे पुणे पोलिस वागत आहे का? असाही प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला आहे. संभाजी महाराजांच्या स्मृतिस्थळी पार्टीची परवानगी दिलीच कशी? रोहिणी खडसे म्हणाल्या, सर्वात पहिले तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस्थळ असलेल्या तुळापूरात या पार्टीची परवानगी दिलीच कशी गेली आणि तेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी! याचा खुलासा मा. गृहमंत्र्यांनी करायला हवा, असे आवाहन त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.
