हिंगोलीत कर्जमाफीच्या निर्णयावर शेतकऱ्यांचा संताप:शासन निर्णय जाळून सरकारविरोधात घोषणाबाजी, सरसकट कर्जमाफीची मागणी

0
cover-placecover-marathi-1_1780902684.jpg




राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असून कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे. या निषेधार्थ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज गोरेगाव येथे एकत्र येत शासनाच्या कर्जमुक्तीच्या निर्णयाची प्रतीकात्मक होळी केली. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली. राज्य सरकारने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना” जाहीर केली असली तरी त्यामध्ये अनेक अटी व शर्ती लावून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात कर्जमाफी नसून “कर्ज वसुली योजना” असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यावेळी बोलताना गजानन कावरखे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे जाहीरपणे सांगितले गेले होते. मात्र प्रत्यक्ष शासन निर्णयात विविध निकष आणि अटी लावून लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने आपल्या आश्वासनाचा मान राखून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. शेतकरी हिताच्या नावाखाली फसवणूक सहन केली जाणार नाही आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, प्रवीण मते, उद्धव कावरखे अनिल कावरखे, मारुती लाखोळे, अमोल एकशिंगे, विठ्ठल सावके, नामदेव काळे, अशोक कावरखे, प्रकाश भुरभुरे यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *