शर्मिला ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे कुटुंब एकत्र:तेजस, रश्मी ठाकरे ‘शिवतीर्थ’वर दाखल; उद्धव ठाकरे येण्याची शक्यता
![]()
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज ‘शिवतीर्थ’वर राजकीय आणि कौटुंबिक भेटीगाठींची लगबग पाहायला मिळत आहे. शुभेच्छा देण्यासाठी रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे तसेच भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ‘शिवतीर्थ’वर भेट दिली. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती असल्याने राजकीय वर्तुळातही या भेटींची चर्चा रंगली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील शर्मिला ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘शिवतीर्थ’वर येण्याची शक्यता आहे. सध्या ते इंडिया आघाडीच्या बैठकीत ऑनलाइन सहभागी होत असल्याने त्यानंतर ते येथे दाखल होऊ शकतात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय जवळीक वाढल्यानंतर दोन्ही कुटुंबांतील सदस्य विविध कौटुंबिक कार्यक्रम आणि विशेष प्रसंगी एकमेकांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरे यांनीही भेट देत शुभेच्छा दिल्या होत्या. उद्धव ठाकरे बैठकीत ऑनलाइन सामील होणार – सुळे दरम्यान, इंडिया आघाडीच्या आज होत असलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीबाबत माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ऑनलाइन माध्यमातून बैठकीत सहभागी होणार असल्याचे सांगितले. विरोधी पक्षांमध्ये समन्वय वाढवणे, आगामी निवडणुकांसाठी रणनीती निश्चित करणे आणि देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करणे हा या बैठकीचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र असून विरोधकांची एकजूट अधिक मजबूत करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या “कॉकरोच जनता पार्टी”चे स्वागत केले. तब्बल 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार: कृषिमंत्री दत्ता भरणे यांची महत्त्वाची घोषणा राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी कर्जमाफी योजनेचा लाभ तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून यासाठी सरकारला 36 हजार 585 कोटी रुपयांचा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कर्जमाफीच्या अटी-शर्तींवरून राज्यभरात वाद सुरू असतानाच भरणे यांनी महत्त्वाचे संकेत देत, आवश्यक वाटल्यास निकषांमध्ये सुधारणा करण्यास सरकार तयार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे विरोधक आणि शेतकरी संघटनांकडून होत असलेल्या टीकेदरम्यान सरकारने मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. सविस्तर वाचा
