अ.भा.मराठी साहित्य संमेलन अचलपूर येथे घेण्याची मागणी:विदर्भ साहित्य संघाला जितेंद्र रोडे यांचे निवेदन
![]()
साहित्य, कला आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेल्या अचलपूर शहरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात यावे, अशी मागणी महानुभाव साहित्याचे अभ्यासक जितेंद्र रोडे यांनी केली आहे. विदर्भ साहित्य संघाच्या नवनियुक्त संचालिका डॉ. जयश्री कुळकर्णी यांचे अभिनंदन करत त्यांच्यामार्फत हे निवेदन संघाकडे सादर करण्यात आले. निवेदनानुसार अचलपूर नगरीला साहित्य, नाट्य आणि सांस्कृतिक परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधरस्वामी, ज्येष्ठ साहित्यिक गो. नि. दांडेकर, प्रख्यात लेखक अरुण साधू, वक्ता दशसहश्रेषु व साहित्यिक राम शेवाळकर यांच्यासह हिंदी आणि उर्दू साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांची ही भूमी आहे. तसेच विदर्भातील नाट्यपरंपरेची सुरुवातही अचलपूर शहरातून झाली आहे. या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अचलपूर येथे झाल्यास विदर्भाच्या साहित्यिक वैभवाला नवी ओळख मिळेल, असे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे. आता पुढे काय निर्णय घेतला जाईल याकडे लक्ष लागले आहे.
