शिवरायांचा इतिहास आता नव्या रूपात:विराग वानखडे साकारणार छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर महानाट्य
![]()
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर येथील विश्वविक्रमी व्यक्तिमत्त्व विराग वानखडे हे महानाट्य साकारणार असून त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने पुढाकार घेतला आहे. जागतिक कीर्तीचे कलावंत, अभियंता व चित्रपट निर्माते अशी विराग वानखडे यांची ओळख आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर ८० कलाकारांना घेऊन त्यांनी महानाट्य उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे या स्तुत्य उपक्रमासाठी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर व त्यांच्या अर्धांगिनी माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी विराग वानखडे व आयएएस अकादमीचे प्रा. नरेशचंद्र काठोळे यांचा सत्कार केला. ते म्हणाले, या महानाट्याच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे. वानखडे व काठोळे यांनी चिखली येथे जाऊन खेडेकर दाम्पत्याची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पूर्ण पाठिंबा जाहीर केला. विराग वानखडे यांनी आठ वेळा जागतिक विक्रम केला असून आता ते नववा विश्वविक्रम करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत वेगवेगळे कार्यक्रम सादर केले आहेत. नुकतेच त्यांचे ‘महा इतिहास’ हे महानाट्य संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरले. हल्ली मुंबई येथील कार्यालयातून कामकाज सांभाळणाऱ्या विराग वानखडे यांच्या चमूत महाराष्ट्रातील इतर ८० कलाकारांचा समावेश आहे. त्यांना घेऊनच ते हे महानाट्य उभारणार आहेत. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर महानाट्य तयार करून त्याचे प्रयोग संपूर्ण भारतात करण्याचा हा अभिनव प्रयोग आहे. याप्रसंगी विराग वानखडे यांनी महानाट्याची पूर्ण रूपरेषा खेडेकर यांना समजावून सांगितली. पटकथा लेखनासाठी पुरुषोत्तम खेडेकर, प्रा. अशोक राणा, गंगाधर बनबरे व इतर ज्येष्ठ संशोधक यांचे सहकार्य घेण्याचेही याप्रसंगी ठरविण्यात आले. या महानाट्याच्या निर्मितीसाठी आवश्यक त्या प्रारंभिक बाबींची तयारी सुरू झाली आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर महानाट्य होणार असल्याने मिशन आयएएसचे ठिकठिकाणी अभिनंदन होत आहे. पुस्तके भेट देऊन सत्कार यासंदर्भात चर्चा करण्यासाठी विराग वानखडे, त्यांच्या पत्नी वंदना वानखडे व मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी चिखली येथे जाऊन पुरुषोत्तम खेडेकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. विशेष म्हणजे पुरुषोत्तम खेडेकर यांनी हा प्रस्ताव उचलून धरला आहे. हा प्रस्ताव आणल्याबद्दल तिघांचाही पुस्तके भेट देऊन सन्मान केला.
