मनोज जरांगेंच्या मालमत्तेची ED चौकशी करा:अमोल खुणे यांची मागणी; सध्याचे आंदोलन 900 कोटींच्या टेंडरसाठी असल्याचा आरोप
![]()
मराठा आंदोलक मनोज जरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मालमत्तेची ईडी चौकशी करण्याची मागणी जरांगेंना मारण्याची सुपारी घेतल्याच्या प्रकरणातील आरोपी अमोल खुणे यांनी शनिवारी केली. मनोज जरांगेंच्या प्रॉपर्टीत अचानक कशी वाढ झाली? त्यांच्या सहकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांच्या जमिनी अचानक कशा घेतल्या? विशेषतः एका व्यक्तीचा तब्बल 5 कोटींचा बोजा तहसीलदारांनी कसा माफ केला? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती या प्रकरणी अमोल खुणे यांनी केली आहे. मनोज जरांगे यांनी आजपासून आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. ते भर उन्हात उपोषणाला बसलेत. त्यांच्यासोबत मराठा समाजाचे शेकडो नागरीकही उन्हात बसले. या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठली असताना अमोल खुणे यांनी मनोज जरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या ईडी चौकशीची मागणी केली आहे. ते बीड बसस्थानकात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मनोज जरांगे यांच्या प्रॉपर्टीत अचानक वाढ कशी झाली? त्यांचे सहकारी पांडुंग तारक यांनी तब्बल 49 एकर जमीन कशी घेतली? गंगाधर काळकुटेंनी चंदन नगरला 7 गुंठे जागा कशी घेतली? स्वप्नील तारखने दीड कोटींची जमीन कशी घेतली? आणि संजय कटारेचा तब्बल 5 कोटींचा बोजा तहसीलदारांनी माफ कसा केला? हे स्पष्ट झाले पाहिजे. विशेषतः या सर्वांची ईडीमार्फत चौकशी करून त्यांची नार्को टेस्ट केली गेली पाहिजे. त्यांच्यासोबत माझीही करा. मी त्यांची सुपारी घेतली असेल, तर मी कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार आहे. पण ते दोषी आढळले तर समाजाने त्यांना दगड मारून, साड्या नेसवून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी त्यांची धिंड काढली पाहिजे. कुठवर डीलपती होणार, कधीतरी थलपती व्हा अमोल खुणे पुढे म्हणाले, या लोकांनी कोणत्यातरी देवस्थानात 700 कोटी रुपये ठेवले आहेत. सध्या 986 कोटी, 150 कोटी व 30 कोटी रुपयांचे जे टेंडर रद्द झाले आहे, ते परत मिळवण्यासाठी हे उपोषण करत आहेत असा माझा तर्क आहे. मराठा समाजाला आंतरवाली सराटीत आणून तुम्हाला तुमचे कॅन्सल झालेले टेंडर परत आणायचे आहे का? कुठवर डीलपती होणार, कधीतरी थलपती व्हा. कुणबी प्रमाणपत्राचा केवळ राजकारणासाठीच वापर अमोल खुणे यांनी यावेळी मराठा आरक्षणांतर्गत कुणबी नोंदी शोधण्याच्या प्रक्रियेवर टीका करत राजकीय नेत्यांवरही निशाणा साधला. सरकारने हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी केली. पण त्यातून केवळ 308 प्रमाणपत्रेच निघाली. कुणबी प्रमाणपत्राचा फायदा फक्त आणि फक्त राजकारणासाठीच वापर झाला. सामान्य माणसांना त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके व खासदार बजरंग सोनवणे यांना माझे खुले आव्हान आहे. त्यांना येथून पुढे कधीही विजयाचा गुलाल लागणार नाही, असे ते म्हणाले.
