Maharashtra Weather Alert | राज्याला उद्या वादळी वाऱ्यासह गारपीटीचा तडाखा बसणार; ‘या’ जिल्ह्यांना धोक्याचा इशारा!
Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रात पुढील 24 तास हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार वारे आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता असली तरी काही भागांसाठी सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस नैऋत्य मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी वातावरण अनुकूल राहणार आहे. नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्र (Arabian Sea), लक्षद्वीप (Lakshadweep) परिसर, तसेच बंगालच्या उपसागरातील (Bay of Bengal) काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून राज्यातील विविध भागांत हवामानात बदल जाणवणार आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दक्षिण कोकण (Konkan) आणि गोवा (Goa), दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा (Marathwada) विभागातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. 30 मे रोजी मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहू शकतात. विदर्भ (Vidarbha) विभागात काही ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Maharashtra Weather Alert | उष्णतेचा कहर कायम :
राज्यातील अनेक शहरांमध्ये अजूनही तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे कायम आहे. वर्धा (Wardha) येथे सर्वाधिक 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपूर (Nagpur) येथे 46.4 अंश, गोंदिया (Gondia) येथे 46.1 अंश, तर चंद्रपूर (Chandrapur) येथे 45.4 अंश तापमान नोंदवण्यात आले. अमरावती (Amravati), अकोला (Akola), यवतमाळ (Yavatmal) आणि वाशिम (Washim) या जिल्ह्यांमध्येही उष्णतेची तीव्रता कायम असल्याचे दिसून आले.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. त्यानंतर तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. मुंबई (Mumbai) शहर आणि उपनगरांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहणार असून कमाल तापमान 34 अंश आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे उकाडा कायम राहण्याची शक्यता असली तरी पावसामुळे काही भागांना दिलासा मिळू शकतो.
