Farm Loan Waiver | आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा; कर्जमाफीचे दिले आदेश
Farm Loan Waiver | राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून कर्जमाफीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य सरकारने 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र विधान परिषद (Legislative Council) निवडणुकांमुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे या निर्णयावर अनिश्चितता निर्माण झाली होती. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष परवानगी दिल्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने पुढे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील शेतकरी अतिवृष्टी, पिकांचे नुकसान आणि शेतमालाला कमी भाव मिळाल्यामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आंदोलन छेडत कर्जमाफीची मागणी केली होती. या आंदोलनात विविध शेतकरी संघटनांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर राज्य सरकारने 30 जूनपूर्वी कर्जमाफी लागू करण्याचा शब्द दिला होता.
दरम्यान, विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने राज्यात आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे कर्जमाफीच्या घोषणेवर अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने या योजनेसाठी विशेष सूट दिल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेली योजना आता निश्चितपणे अंमलात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Farm Loan Waiver | 30 जूनपूर्वी घोषणा होण्याची शक्यता :
मिळालेल्या माहितीनुसार, पात्र शेतकऱ्यांची पडताळणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यामुळे 30 जूनपूर्वी अधिकृत आदेश आणि घोषणाही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारकडून प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
या कर्जमाफी योजनेअंतर्गत नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. तसेच आर्थिक अडचणीत सापडलेल्या आणि बँकेचे कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
