कांदा प्रश्नावर 10 दिवसांत तोडगा निघणार:अमित शहांसोबत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सुनेत्रा पवारांची माहिती; निर्यातबंदीही उठणार!
![]()
महाविकास आघाडीकडून तसेच इतर विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावासंदर्भात सत्ताधाऱ्यांविरोधात मोठे आंदोलन केले होते. महाविकास आघाडीकडून काल (दि. 26 मे) नाशिक येथे रस्ता जाम आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात शेतकऱ्यांचाही मोठा सहभाग दिसून आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाने दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेते दिलीप वळसे पाटील तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी या बैठकीच्या संदर्भात माहिती दिली आहे. बैठकीत झालेल्या चर्चेविषयी सांगताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, साखर उद्योग आणि कांद्याच्या प्रश्नावर आज महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात अतिशय सकारात्मक बैठक पार पडली. कांद्याचा आणि साखर उद्योगात शेतकरी अत्यंत कठीण प्रश्नांना तोंड देत होते. त्याबाबत नक्कीच साधकबाधक चर्चा झाली. आम्हाला 10 दिवसांत सकारात्मक निर्णय देण्याचे आश्वासन मिळाले आहे. पुढे बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी आणि साखर उद्योगाला दिलासा देणारी घटना आज घडलेली आहे. आम्ही अत्यंत समाधानी आहोत. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत अत्यंत चांगली चर्चा झाली. मी भारत सरकारचे मनापासून आभार मानते. आता सध्या कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल, अशी माहिती पवारांनी दिली आहे. दिलीप वळसे पाटील काय म्हणाले? बैठकीबाबत बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, या बैठकीत कांदा प्रश्नावर मोठा तोडगा निघेल, अशी आशा राज्यातील शेतकऱ्यांना होती. त्यानुसार या प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे कांद्याच्या निर्यातीवर बंदी नाही. तशी बंदी असेल तर उद्यापर्यंत ती बंदी उठवू, असे आश्वानस अमित शाह यांनी दिले आहे.
