विद्यार्थिनीने कुलर मागितले तर मिळाली नोटीस:नागपूरच्या सावित्रीबाई फुले वसतिगृहातील प्रकार; हा प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा – काँग्रेस
![]()
उन्हाळ्यामुळे प्रचंड उकडत असल्यामुळे एका विद्यार्थिनीने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कुलरची मागणी केली. त्यानंतर वसतिगृह प्रशासनाने सदर विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस बजावल्याची संतापजनक घटना नागपुरात घडली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा प्रकार लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणारा असल्याची टीका करत सरकारवर आगपाखड केली आहे. आकांक्षा उके असे पीडित विद्यार्थिनीचे नाव आहे. ती नागपुरातील सावित्रीबाई फुले वसतिगृहात राहते. सध्या वाढत्या तापमानामुळे विदर्भात प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे आकांक्षा व तिच्या मैत्रिणींनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वसतिगृहासाठी कुलरची मागणी केली. तिच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाने तात्काळ कुलर उपलब्ध करून दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टीही काढल्याची माहिती आहे. याचा राग मनात धरून आता वसतिगृह प्रशासाने आकांक्षा उके हिलाच वसतिगृहातून हकालपट्टी करण्याची नोटीस बजावली आहे. यामुळे या गरीब विद्यार्थिनीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 6 महिन्यांचा निवास व भोजनाचा खर्च देण्याची ताकीद वसतिगृहाने आकांक्षा उके ही बाहेर नोकरी करते असा आरोप करत तिची हकालपट्टी करण्याची नोटीस बजावली आहे. तसेच तिच्याकडून 6 महिन्यांचा निवास व भोजनाचा खर्चही जमा करण्याची ताकीद दिली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच गरीब विद्यार्थिनीसोबत होणारा हा प्रकार लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणारा असल्याचा आरोपही केला आहे. लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणारा प्रकार विजय वडेट्टीवार म्हणाले, नागपूरमधील सावित्रीबाई फुले वसतिगृहात घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. शेतकरी कुटुंबातील एका विद्यार्थिनीने उन्हाच्या तीव्रतेत कूलरची मूलभूत सुविधा मागितली आणि त्यासाठी थेट मुख्यमंत्री स्तरावर तक्रार केली, एवढंच तिचं “गुन्हा” ठरवलं गेलं का? त्यानंतरच तिला वसतिगृहातून बाहेर काढण्याची नोटीस देण्यात आली, हा प्रकार लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणारा आहे. वसतिगृहातील असुविधा मांडणे, प्रश्न विचारणे आणि न्याय मागणे यावर जर कारवाई होत असेल, तर ही प्रशासनाची चूक नाही तर उघड सूडबुद्धी आहे. “सावित्रीच्या लेकीला” तिच्याच नावाने ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले वसतिगृहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होणे, हा केवळ विरोधाभास नाही तर व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह आहे. अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत संपते. नागपूरमधील या संपूर्ण प्रकरणाची तातडीने निष्पक्ष चौकशी व्हायलाच हवी आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा हा प्रकार व्यवस्थेच्या विश्वासाला मोठा धक्का देणारा ठरेल, असे ते म्हणालेत.
