मंत्री नीतेश राणे म्हणजे करमणुकीचे साधन:सत्ताधारी NCP च्या आमदाराचा घणाघात; बकरी ईदच्या कुर्बाणीवरून साधला निशाणा
![]()
मंत्री नीतेश राणे हे केवळ करमणुकीचे साधन असल्याची टीका सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रीस नायकवडी यांनी केली आहे. मंत्री नीतेश राणे यांना यांना सध्या कुणीही सीरियस घेत नाही. त्यांच्याकडे केवळ करमणुकीचे साधन म्हणून पाहिले जाते, असे ते म्हणालेत. त्यांच्या या टीकेमुळे सत्ताधारी महायुतीतील घटकपक्षांत वादाची ठिणकी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नीतेश राणे यांनी बकरी ईदच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या कुर्बाणीवर आक्रमक भूमिका घेतली आहे. बकरीदच्या नावाखाली कुणी आमच्या गो मातेकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर त्यांचा मुक्काम थेट तुरुंगात असेल, असा इशारा त्यांनी यासंबंधी दिला आहे. त्याचे राजकीय वर्तुळात संमिश्र पडसाद उमटत असताना आमदार इद्रीस नायकवडी यांनी सांगली येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्यावर उपरोक्त शब्दांत निशाणा साधला आहे. नीतेश राणे यांचा केवळ बालिशपणा सुरू मंत्री नीतेश राणे यांना आता कुणीही सीरियस घेत नाही. त्यांच्याकडे केवळ करमणुकीचे साधन म्हणून पाहिले जाते. त्यांनी आम्हाला धार्मिक तत्त्वे कसे पाळावे याचे मार्गदर्शन करण्याची गरज नाही. समाजात दुफळी निर्माण करून स्वतः हिरो म्हणून पुढे येण्यासाठी त्यांचा सातत्याने बालिशपणाचा प्रयत्न सुरू असतो, असे इद्रीस नायकवडी म्हटले आहे. यावेळी त्यांनी गाईला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करण्याची मागणीही केली. मुस्लिम समाजाने गाईला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. सरकारने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन गाय राष्ट्रीय पशू घोषित करावे, असे ते म्हणाले. गोवंश हत्या बंदी कायद्याचे उल्लंघन होऊ देऊ नका – नार्वेकर उल्लेखनीय बाब म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही दोन दिवसांपूर्वीच राज्याच्या पोलिस महासंचालकांना काही सूचना केल्या होत्या. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी योग्य ती कारवाई करा. विशेषतः राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्याचे उल्लंघन होणार नाही याकडेही लक्ष द्या. गोरक्षकांवर हल्ले होणार नाहीत याचीही खबरदारी घ्या, असे ते म्हणाले होते. आत्ता पाहू काय म्हणाले होते नीतेश राणे? नीतेश राणे यांनी सोमवारी एमआयएमचे नेते वारीस पठाण यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते, राज्यात अनेक ठिकाणी बकरीच्या मांसाच्या नावाने गोमांसाची विक्री केली जात आहे. जनावरांची तस्करी सुरू आहे. तुम्हाला तुमच्याच धर्मातील जिहादींना आवर घालता येत नसेल, त्यांनी आमच्या हिंदू राष्ट्रात कसे वागावे हे शिकवता येत नसेल, तर आम्हाला जीआर काढून दंड ठोठावावा लागेल. त्यामुळे बकरीदच्या नावाखाली कुणी आमच्या गो मातेकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर त्यांचा मुक्काम थेट तुरुंगात असेल. यावेळी त्यांनी रस्त्यांवर अदा करण्यात येणाऱ्या नमाजाप्रकरणी तुरुंगावास भोगण्याचाही इशारा दिला होता. ते म्हणाले होते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने एक शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार, गोमांसाशी संबंधित गुन्ह्यांत सहभाग असलेल्या व्यक्तींवर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कायद्यातील कठोर तरतुदी लागू केल्या जातील. पोलिसांनी या प्रकरणी विविध ठिकाणी संचलन सुरू केले आहे. नियमांचे उल्लंघन करण्याचा किंवा शरिया कायदा लागू करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यासंबंधी तुरुंगाची हवा खावी लागेल.
