Vitthal Temple | आषाढ महिन्यात पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला जाताय? आधी ‘हा’ नवा नियम वाचा; सरकारने घेतला मोठा निर्णय!
Vitthal Temple | पंढरपूर (Pandharpur) येथील आषाढी वारीसाठी राज्यभरातील वारकरी मोठ्या संख्येने दाखल होत असतात. यंदा सर्वसामान्य भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन मिळावे यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आषाढ महिनाभर विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर (Solapur) जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
आषाढी वारी जवळ येताच पंढरपूर (Pandharpur) येथे लाखो भाविकांची गर्दी उसळते. कोणत्याही निमंत्रणाशिवाय दरवर्षी सुमारे 15 लाखांहून अधिक वारकरी विठ्ठल दर्शनासाठी येथे येतात. गर्दी वाढल्यानंतर मंदिरातील दर्शन रांग अनेक किलोमीटरपर्यंत पोहोचते आणि भक्तांना दर्शनासाठी तब्बल 15 तास प्रतीक्षा करावी लागते. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य भक्तांना प्राधान्य देण्यासाठी प्रशासनाने व्हीआयपी दर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापूरचे (Solapur) पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी याबाबत माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, आषाढ महिन्यात केवळ वारकरी भक्तांनाच महत्त्व दिले जाणार असून राजकीय नेते, अधिकारी, उद्योगपती किंवा इतर व्हीआयपी व्यक्तींना विशेष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे मंदिर व्यवस्थापनावरील अतिरिक्त ताणही कमी होणार आहे.
Vitthal Temple | अधिक मासामुळे वाढली भाविकांची गर्दी :
सध्या पुरुषोत्तम अधिकमास सुरू असल्याने पंढरपूर (Pandharpur) येथे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या काळातही मंदिर प्रशासनाने व्हीआयपी दर्शन बंद ठेवले आहे. त्यामुळे सामान्य भक्तांना कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन घेणे शक्य होत असल्याचे सांगितले जात आहे.
आषाढ महिन्यातही हीच व्यवस्था कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारकरी भक्तांना शांत आणि सुरळीत दर्शन व्यवस्था मिळावी, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी अधिक सुलभ भक्तिमार्ग उपलब्ध होणार असल्याचे मानले जात आहे.
