आमदार इद्रीस नायकवाडींनी राजीनाम्याच्या चर्चा फेटाळल्या:म्हणाले- अजितदादांनी विधानसभेच्या तयारीला लागायला सांगितले होते
![]()
राज्यपालनियुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रीस नायकवाडी यांच्या राजीनाम्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असून, पक्षानेच त्यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याचे बोलले जात आहे. मात्र, नायकवाडी यांनी या चर्चा फेटाळून लावत, पक्षाकडून किंवा कोणत्याही नेत्याकडून आपल्याला राजीनाम्याबाबत सांगण्यात आले नसल्याचे आणि उद्या होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत आपण यावर चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना इद्रीस नायकवाडी यांनी सांगितले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारकी देताना ही संधी एकदाच असून, भविष्यात विधानसभा निवडणूक लढवायची असल्याने आतापासूनच तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे पदाचा मध्येच राजीनामा देण्याबाबत कधीही कोणतीही चर्चा झाली नव्हती. इद्रीस नायकवाडी म्हणाले, पक्षाकडून मला अद्याप राजीनाम्याबाबत सांगितलेलं नाही, प्रत्येक पक्षात असे काही लोक असतात जे अशा प्रकारे चर्चा करत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची उद्या बैठक आहे. मी नक्कीच या चर्चांबाबत बोलेल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ओएसडी माझ्याकडे आले होते. माझा हात फ्रॅक्चर झाला होता, तेव्हा कोल्हापूर भागात ते होते म्हणून भेटायला आले होते, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे. पुढे बोलताना इद्रीस नायकवाडी यांनी त्यांची एक जुनी आठवण सांगितली. ते म्हणाले, राजीनामा मागण्याबाबत एक प्रसंग घडला होता. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा महापौर असताना मला राजीनामा देण्यासाठी दबाव आणला होता. त्यावेळी नेतृत्वाला मी राजीनामा देणार नाही हे स्पष्ट केले होते. मुळात त्यावेळी मी स्थानिक आघाडी करून 48 नगरसेवक निवडून आणले होते आणि महापौर झालो होतो. त्यामुळे राजीनामा देणार नसल्याचे सांगितले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार झालेले इद्रीस नायकवाडी यांना दिवंगत नेते अजित पवार यांनी पक्षाचा अल्पसंख्यांक चेहरा म्हणून विधान परिषदेवर संधी दिली होती. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर आता पक्षाच्या नेतृत्वाकडून नायकवाडी यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली जात असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असून, याच अनुषंगाने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ओएसडीने नुकतीच नायकवाडी यांची भेट घेतली होती. कोण आहेत इद्रीस नायकवडी? सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेले इद्रीस नायकवाडी यांना, अल्पसंख्याक समाजातील त्यांचे मोठे योगदान आणि महत्त्व लक्षात घेऊन, दिवंगत नेते अजित पवार यांनी 15 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेवर संधी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर नायकवाडी यांनी ठामपणे अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि याच निष्ठेची पोचपावती म्हणून अजित पवारांनी त्यांना पक्षाचा अल्पसंख्याक चेहरा म्हणून विधान परिषदेवर नियुक्त केले होते.
