पुसली धरणात बुडून 3 सख्ख्या भावंडांचा मृत्यू:तिघांचेही मृतदेह पाण्यात तरंगताना आढळले, अंघोळीला गेल्याने घडली दुर्घटना
![]()
अमरावती जिल्ह्यातील पुसली धरणात 3 चिमुकल्या भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. हे तिघेही रविवारपासून बेपत्ता झाले होते. त्यांचे मृतदेह सोमवारी दुपारी धरणाच्या पाण्यात तरंगताना आढळले. एकाच घरातील 3 हसतीखेळती मुले एकाचवेळी काळाच्या पडद्याआड केल्यामु्ळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पंकज संतुलाल उईके (10), प्रिया संतुलाल उईके (8) व पवन संतुलाल उईके (7) अशी मृत्यू झालेल्या तिन्ही भावंडांची नावे आहेत. ही तिन्ही मुले नरखेड येथील एका आश्रमशाळेत शिकत होती. ते सध्या सुट्ट्या असल्यामुळे आपल्या आई-वडिलांकडे आले होते. हे तिघेही रविवारी दुपारी घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर सायंकाळी झाली ते घरी परतले नाही. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या त्यांच्या आई-वडिलांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू केला. त्यांचा शोध रात्रभर सुरू होता. सोमवारी सकाळपासून त्यांचा शेतशिवारासह पुसली धरण परिसरात शोध घेण्यात आला. त्यात दुपारी 2 च्या सुमारास तिन्ही भावंडांचे कपडे धरणाच्या काठावर आढळून आले. त्याची खबर तात्काळ स्थानिक पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर त्यांचा धरणात शोध घेतला असता तिन्ही भावंडांचे मृतदेह धरणाच्या पाण्यात तरंगताना आढळले. ही मुले धरणात अंघोळीसाठी गेली असावीत आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एकाला वाचवण्याच्या नादात तिघेही बुडाले असावेत, असा अंदाज या प्रकरणी व्यक्त केला जात आहे. पोलिस अधिकारी दीपक महाडिक यांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. पीडित कुटुंब मूळचे मध्य प्रदेशचे संतुलाल उईके हे मूळचे मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील घाना बिंद्रा येथील आहेत. ते रोजगारासाठी शेंदूरजनाघाट येथील मनोहर निमकर यांच्या शेतात सातनूर येथे झोपडी करून वास्तव्यास होते. स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून आलेल्या या कुटुंबावर नियतीने अत्यंत क्रूर घाला घातला. संतुलाल यांनी आपल्या तिन्ही मुलांना पोहता येत नसल्याचे सांगितले. दरम्यान, ज्या वयात या चिमुकल्यांनी खेळायचे बागडायचे अगदी त्याच वयात या तिघांचेही मृतदेह पाहण्याची वेळ त्यांच्या संतुलाल व त्यांच्या पत्नीवर आली. त्यामुळे त्यांचा हंबरडा पाहून घटनास्थळी उपस्थित सर्वांचेच डोळे पानावले. एकाच कुटुंबातील 3 मुलांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत. हे ही वाचा…
