अपर आयुक्त राजेश खवले यांचा स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना कानमंत्र:यशासाठी सातत्यपूर्ण अभ्यास आणि नियोजनाचे महत्त्व सांगितले
![]()
नागपूरचे अपर आयुक्त राजेश खवले यांनी अमरावती येथे सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. खचून न जाता सातत्याने परिश्रमपूर्वक नियोजनबद्ध रीतीने योग्य अभ्यास केल्यास जीवनात यशस्वी होता येते, असा कानमंत्र त्यांनी दिला. खवले यांनी स्वतःच्या जीवनातील अनुभव कथन केला. ग्रामीण भागातून येऊन कापडाच्या दुकानात काम करत असताना, माहुली जहागीर ते अमरावती असे दररोज २५ किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी अभ्यास केला. त्या काळात उपलब्ध असलेल्या कॅसेटवरून स्पर्धा परीक्षेची तयारी करून ते आज अपर आयुक्त पदावर पोहोचले आहेत. वलगाव येथील सिकची रिसॉर्टमध्ये हे आठवडाभराचे शिबिर सुरू आहे. अमरावतीची डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी, प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट आणि त्रिवेणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्या मातोश्री श्रीमती शारदाताई इटनकर होत्या. यावेळी प्रेरणा खवले, डॉ. यशस्वी खवले, सिकची रिसॉर्टचे संचालक सचिन माळकर, प्रा. पल्लवी एरुळकर, भंडाऱ्याचे विभागीय संचालक शंकर पत्रे, गोंदियाचे विभागीय संचालक संजय काशिवार, नंदुरबारचे विभागीय संचालक शांतीलाल महाजन, चंद्रपूरचे विभागीय संचालक मुनीराज कुथे, मुंबई येथील तज्ञ मार्गदर्शक राजेश चव्हाण, जळगाव येथील सुप्रसिद्ध वक्ते एजाज शेख, पुणे येथील डीएनए या संशोधन संस्थेचे प्रा. डॉ. मुळे व प्रा. आलिया अहुवालिया उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी केले, तर आकाश खारवे यांनी आभार प्रदर्शन केले. या शिबिरात पुणे, नाशिक, नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यांमधून १२५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. शिबिराचा समारोप शुक्रवार, २२ मे रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र राज्याचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या उपस्थितीत होणार आहे. महसूल आणि स्थानिक स्वराज्य संस्था या दोन्ही यंत्रणांचा अनुभव असलेल्या खवले यांनी विद्यार्थ्यांना दोन तास मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांना प्रश्न विचारले आणि अनेक उदाहरणे दिली. त्यांच्या भाषणानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी मंचावर गर्दी केली होती.
