महाराष्ट्रात लोकप्रिय कोण? फडणवीस की शिंदे?:CM पदासाठी शिंदेंना सर्वाधिक पसंती असल्याच्या दाव्याची भाजपकडून अक्षरशः खिल्ली
![]()
महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासाठी सर्वात पसंतीचा उमेदवार कोण? असा सर्व्हे केला तर एकनाथ शिंदे यांच्याच नावाला सर्वाधिक पसंती मिळेल, या आमदार बच्चू कडू यांच्या दाव्यामुळे सत्ताधारी भाजप व शिवसेनेत राजकीय कलगीतुरा रंगला आहे. भाजपने बच्चू कडू यांच्या या दाव्याची अक्षरशः खिल्ली उडवली आहे. आता नोकरी मिळाली, तर बच्चू कडूंना आपल्या मालकाचे गुणगान करावेच लागेल. पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता किती आहे हे शेंबडे पोरही सांगेल, असे भाजपने या प्रकरणी म्हटले आहे. बच्चू कडू यांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे विधान केले होते. महाराष्ट्रात आज कुणी मुख्यमंत्रिपदासाठी सर्व्हे केला, तर जनतेच्या मनातून केवळ एकनाथ शिंदे यांचेच नाव समोर येईल. त्यांच्या सर्वसामान्यांशी असलेल्या बांधिलकीमुळेच मलाच काय, तर अवघ्या महाराष्ट्राला ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते. यासाठी देवाला साकडे घालण्याची गरज नाही. आता आम्ही थेट जनतेलाच साकडे घालू, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर भाजपमधून संतप्त प्रतिक्रिया आली आहे. बच्चू कडूंना महाराष्ट्राची नस कधीपासून कळायला लागली? भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी या प्रकरणी बच्चू कडू यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. या प्रकरणी त्यांनी त्यांचा उल्लेख नौटंकीछाप असा केला आहे. ते अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, ज्या अचलपूर मतदारसंघाने बच्चू कडू नावाची नौटंकी आपल्या मतदारसंघातून हद्दपार केली. बच्चू कडू यांना स्वतःच्या मतदारसंघाची नस ओळखता आली नाही. त्यांना महाराष्ट्राची नस कधीपासून समजायला लागली. महाराष्ट्राच्या जनतेचे म्हणणे कधीपासून समजायला लागले. बच्चू कडू यांची नोकरी गेलेली होती. त्यांचा कामधंदा गेलेला होता. आता ज्या मालकाने नोकरी दिली त्या मालकाचे गुणगान तुम्हाला करावेच लागेल. आमच्या देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता किती आहे हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील शेंबडे पोरही सांगेल. पण ती लोकप्रियता तुम्हाला दिसणार नाही. कारण, ज्या धन्याने तुम्हाला चाकरी दिली, त्या धन्याचे पांग फेडायचे असतील तर जरूर फेडा, ते म्हणाले. महायुतीमधील अंतर्गत स्पर्धा चव्हाट्यावर उल्लेखनीय बाब म्हणजे महायुतीने 2024 ची विधानसभा निवडणूक ही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली. पण निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री झाले, तर शिंदेंना उपमुख्यमंत्री म्हणून दुय्यम स्थानावर समाधान मानावे लागले. तेव्हापासून अनेकदा शिंदेंची नाराजी दिसून आली. त्यात आता बच्चू कडू यांनी उपरोक्त विधान केल्यामुळे एकप्रकारे एकनाथ शिंदे यांच्या मनातील सलच बोलून दाखवली आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाची चर्चा भाजप व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसह सोशल मीडियातही रंगली आहे. दरम्यान, महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांनी अद्याप यावर कोणतेही भाष्य केले नाही. हे ही वाचा…
