वर्षा गिरी, अश्विनी जाधव यांना सदाफुली पुरस्कार
![]()
आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगल यांची १२ मे रोजी जयंती जागतिक स्तरावर परिचारिकांच्या अमूल्य योगदानासाठी साजरी करण्यात येतो. या महान सेवाकार्याची दखल म्हणून कस्तुरी या सेवाभावी संस्थेच्या वतीने आरोग्य सेवा क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या वर्षा गिरी आणि अश्विनी जाधव या दोन परिचारिकांचा “सदाफुली’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मागील ३० वर्षापासून समर्पित भावनेने सेवा करणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोच्च रुग्णालयातील परिसेविका वर्षा सुनील सुनील गिरी व जिल्हा स्त्रियांचे रुग्णालयातील अधिपरिचारिका अश्विनी राजेश जाधव यांना त्यांच्या अविश्रांत व निरपेक्ष सेवावृत्तीची दखल घेऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह असे होते. प्रसंगी कस्तुरीच्या सदस्या संगीता जोध यांना सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाने ‘उत्कृष्ट परिचारिका’ हा पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचाही कस्तुरीच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी कस्तुरीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. किशोर बुटोले यांनी प्रास्ताविकातून कस्तुरीचे सेवाकार्य, रुग्णांच्या सेवेतील परिचारिकांची भूमिका आणि सदाफुली पुरस्कार यांविषयी भूमिका मांडली. कस्तुरीच्या सदस्या संगीता जोध यांनी सदाफुली पुरस्कार प्राप्त परिचारिकांचा परिचय करून दिला. वर्षा गिरी व अश्विनी जाधव यांनी कस्तुरीच्या वतीने करण्यात आलेला सन्मान ही आम्ही केलेल्या सेवाकार्याची पावती असून संस्थेने घेतलेली दखल ही प्रेरणादायी आहे व कौतुकाची थाप आहे असे उद्गार या प्रसंगी काढले. याप्रसंगी माजी आमदार वसंतराव खोटरे, संजय गायकवाड, राजेश्वर पेठकर, अनिल पालवे, संजय बुटोले, दीपक झाडे, प्रा. उज्वला वाजपेयी, चेतना आनंदानी, अपर्णा काळे,अनिता इधोळ, संगीता जोध व किशोर बांधवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
