कांदा प्रश्न पुन्हा पेटला!:किसान काँग्रेस आक्रमक, मंत्रालयासमोरील रस्त्यावर कांदे फेकत सरकारचा निषेध, आंदोलन ताब्यात
![]()
राज्यात कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला असून, योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. आज महाराष्ट्र किसान काँग्रेसच्या वतीने थेट मंत्रालयाबाहेर आक्रमक निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी मंत्रालयासमोरील मुख्य रस्त्यावर कांदे फेकून सरकारचा निषेध केला. यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. आज मंत्रालयात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक सुरू असतानाच किसान काँग्रेसचे कार्यकर्ते आणि शेतकरी मंत्रालयाबाहेर जमा झाले. “कांद्याला भाव द्या, शेतकऱ्यांना न्याय द्या” अशा घोषणा देत आंदोलकांनी सोबत आणलेले कांदे रस्त्यावर फेकून दिले. वारंवार निवेदने देऊनही सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. प्रमुख मागण्या काय आहेत? कांदा अनुदान: प्रलंबित असलेले कांदा अनुदान त्वरित मिळावे. आर्थिक मदत: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना १० लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत द्यावी. पीक विमा: २०२५ चा खरीप पीक विमा तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा. योग्य भाव: कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळावा. पोलिसांन उचलले रस्त्यावरील कांदे या आंदोलनाचा इशारा आधीच देण्यात आला असल्याने प्रशासनाने मंत्रालयाबाहेर कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, तरीही आंदोलकांनी पोलिसांना चकवा देत मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर कांदे फेकले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत रस्त्यावरील कांदे गोळा केले आणि आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले.
