अजितदादांची झलक, जयदादांचा जनता दरबार:बारामतीत नागरिकांची मोठी गर्दी; अजित पवारांनंतर बारामतीला नवे युवा नेतृत्व
![]()
बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय अजित पवार यांच्या जनता दरबाराला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अजित पवार यांच्या कार्यपद्धतीची आठवण करून देणारी शैली, नागरिकांशी थेट संवाद आणि तातडीने समस्या सोडवण्याचा प्रयत्न यामुळे बारामतीत ‘जयदादा’ अशी ओळख तयार होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दर गुरुवारी राष्ट्रवादी भवनात जनता दरबार घेण्याची घोषणा जय पवार यांनी केली होती. त्यानुसार आज पार पडलेला हा दुसरा जनता दरबार ठरला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. आज सकाळी अकरा वाजल्यापासून जनता दरबाराला सुरुवात झाली. बारामती आणि परिसरातील अनेक नागरिक विविध अडचणी, विकासकामे, शासकीय प्रश्न तसेच वैयक्तिक समस्या घेऊन राष्ट्रवादी भवनात दाखल झाले होते. जय पवार यांनी प्रत्येक नागरिकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. अनेक प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. जनता दरबारात आलेल्या अनेक नागरिकांनी अजित पवार यांच्या कामकाजाची आठवण काढत जय पवार यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. अजितदादांनंतर पुन्हा सहज उपलब्ध होणारे आणि जनतेशी जोडलेले नेतृत्व मिळाले, अशी भावना काही नागरिकांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीनंतर जय पवार यांचा हा दुसरा जनता दरबार असून, पुढेही दर गुरुवारी बारामतीत वेळ देणार असल्याचे त्यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्येही नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जय पवार यांच्याकडे खजिनदाराची जबाबदारी दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील जबाबदाऱ्यांमुळे जय पवार आणि पार्थ पवार हे दोघेही सध्या चर्चेत आहेत. 29 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या यादीत पार्थ पवार यांना राष्ट्रीय महासचिव, तर जय पवार यांना राष्ट्रीय सचिवपद देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच जय पवार यांच्याकडे राष्ट्रीय शिस्त पालन समितीचे अध्यक्षपद आणि खजिनदाराची जबाबदारीही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या यादीत तांत्रिक त्रुटी असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले असले, तरी अद्याप सुधारित यादी जाहीर न झाल्याने पक्षातील आर्थिक आणि संघटनात्मक सूत्रे पवार कुटुंबीयांकडेच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
