एकनाथ शिंदे स्वत:च्या ताफ्यातील गाड्या करणार कमी:पीएम मोदींच्या आवाहनानंतर उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय, विरोधकांचाही घेतला समाचार
![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक संकट आणि इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. “देशाचे हित लक्षात घेऊन मी माझ्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला असून, आता केवळ सुरक्षेसाठी आवश्यक तितक्याच गाड्या माझ्यासोबत असतील,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, इंधन बचतीचा वस्तुपाठ घालून देण्यासाठी त्यांनी स्वतः इलेक्ट्रिक वाहनाचा (EV) वापर सुरू केला असून इतर मंत्र्यांनाही तशाच सूचना दिल्या आहेत. पंतप्रधानांच्या आवाहनाचे समर्थन करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, सध्या जगाच्या काही भागांत युद्ध सुरू असले तरी त्याचे आर्थिक परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. इंधन आयातीसाठी देशाला मोठ्या प्रमाणावर डॉलर खर्च करावे लागतात. अशा परिस्थितीत प्रत्येक भारतीयाने पेट्रोल आणि डिझेलचा वापर मर्यादित ठेवणे हे राष्ट्रहिताचे कार्य आहे. ज्याप्रमाणे कोविड संकटाच्या काळात जनतेने पंतप्रधानांच्या हाकेला ओ देऊन देशाला सुरक्षित ठेवले, त्याचप्रमाणे आताही ‘नेशन First’ हा विचार करून इंधन बचतीसाठी पुढे येणे आवश्यक आहे. राजकारण कुठे अन् केव्हा करावे विरोधकांनी ठरवावे एकनाथ शिंदे म्हणाले, आपल्या देशातील नागरिकांना यु्द्धाच्या परिणामांचा कमीत कमी फटका बसला पाहिजे, कमी परिणाम झाला पाहिजे, या हेतून मोदींनी काटकसरीचे आवाहन केलेले आहे. राजकारण कधी करावे आणि कुठे करावे? हे विरोधी पक्षाने ठरवले पाहिजे. राजकारण करायचे खूप वेगवेगळे प्रसंग आणि संधी असतात. परंतु अशा परिस्थितीत विरोधकांनी राजकारण करता कामा नये. हे केवळ राजकारण आहे. मोदींना बदनाम करण्यासाठी सर्वकाही सुरू आहे. विरोधकांच्या हातात सध्या काही नाहीये. मोदींच्या मागे १४० कोटी जनता आहे. म्हणून तर पश्चिम बंगाल, आसामध्ये जो विजय मिळालाय, हे त्याचे दृश्य आहे. विरोधकांना टीकेचा परिणाम भोगावा लागतो जेव्हा जेव्हा विरोधकांनी मोदींना विरोध केला, तेव्हा तेव्हा १४० कोटी मोदींच्या सोबत आणि त्यांना साथ दिली. राहुल गांधी देशातही टीका करतात आणि बाहेर देशात जाऊनही टीका करतात. त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो. आज काँग्रेसची देशात काय परिस्थिती आहे? जनता सुज्ञ आहे. त्यामुळे विरोधकांनी यामध्ये राजकारण करू नये. देशहितासाठी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला पाहिजे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेला कळकळीचे आवाहन केवळ सरकारी पातळीवरच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांनीही इंधन बचतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. वैयक्तिक स्तरावर पेट्रोल आणि डिझेलचा वापर कसा कमी करता येईल आणि त्याचे योग्य नियोजन कसे करता येईल, याकडे प्रत्येक नागरिकाने लक्ष द्यावे. हे पाऊल कोणा एका पक्षासाठी नसून संपूर्ण देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
