पुणे महापालिकेत निधी वाटपात भेदभाव:सुनेत्रा पवारांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र; 'सबका साथ, सबका विकास'ची करून दिली आठवण
![]()
पुणे महानगरपालिकेच्या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात निधी वाटपावरून महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीच्या तुलनेत अधिक निधी मिळाल्याचे समोर आल्यानंतर, राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. सुनेत्रा पवार यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ची आठवण करून देत, “शहराचा विकास करताना कोणत्याही एका भागाला किंवा गटाला झुकते माप देऊ नका,” असे आवाहन त्यांनी या पत्रातून केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात सत्ताधारी भाजपच्या प्रत्येक नगरसेवकाला विकासासाठी ७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याउलट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा निधी दिला गेला आहे. महायुतीचे सरकार असतानाही अशा प्रकारे दोन कोटींची तफावत ठेवल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. हीच बाब लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून समान निधी वाटपाची मागणी केली आहे. पत्रातील ‘सबका साथ, सबका विकास’चा मंत्र सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात ‘महायुती’च्या धर्माची आठवण करून दिली आहे. त्यांनी नमूद केले की, “आज आपण राज्य आणि केंद्र स्तरावर महायुती म्हणून एकत्र काम करत आहोत. अशा परिस्थितीत शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सत्ताधारी आणि मित्रपक्षांच्या सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निधीचे वाटप करणे आवश्यक आहे. पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईन, रस्ते विकास आणि पथदिवे यांसारख्या मूलभूत गरजा राजकीय पक्षांच्या सीमांपलीकडे आहेत.” नागरिक सुविधांपासून वंचित राहण्याची भीती कोणत्याही एका प्रभागाला अधिक निधी आणि दुसऱ्याला कमी निधी मिळाल्यास, संबंधित भागातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहू शकतात, अशी भीती सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली आहे. “सबका साथ, सबका विकास” या ध्येयानुसार भाजप आणि राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना, माजी नगरसेवकांना तसेच लोकप्रतिनिधींना त्यांच्या प्रभागासाठी समान निधी वाटप व्हावा, यासाठी संबंधित प्रशासनाला योग्य ते निर्देश द्यावेत, अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. हे ही वाचा… मंत्र्यांची ईव्ही खरेदीची चमकोगिरी, पण सर्वसामान्यांचे काय?:बेस्ट आणि मेट्रोचे तिकीट स्वस्त होणार का? आदित्य ठाकरेंचा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचे आवाहन केल्यानंतर, राज्यातील मंत्री आणि सत्ताधारी आमदार आपल्या कामकाज आणि दौऱ्यासाठी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करत आहेत. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “आमच्या सरकारने २०२१ मध्ये आणलेले ई-वाहन धोरण या सरकारने बासनात गुंडाळले असून, आता केवळ प्रसिद्धीसाठी आणि ‘फोटो सेशन’साठी मंत्री आणि आमदारांकडून ई-वाहने खरेदी केली जात आहेत,” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. सविस्तर वाचा…
