शरद पवारांची सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी:मोदींना म्हणाले – राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय – प्रक्रिया राबवा

0
730-x-548-new-2026-05-09t144627845_1778562161.jpg




मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य आणि अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या घोषणांवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या निर्णयांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा आणि दूरगामी परिणाम होऊ शकतो, असे मत त्यांनी मांडले. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. सध्याची परिस्थिती चिंताजनक असून केंद्र सरकारने अधिक जबाबदारीने पावले उचलण्याची गरज असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रीय हिताशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेताना सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. देशासमोर निर्माण झालेल्या परिस्थितीत एकत्रित चर्चा आणि व्यापक सल्लामसलत गरजेची असल्याचे सांगत पवार यांनी केंद्र सरकारने संवेदनशीलतेने भूमिका घ्यावी, असे आवाहन केले. देशहिताच्या मुद्द्यांवर सामूहिक निर्णय प्रक्रिया अधिक प्रभावी ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले. शरद पवार यांनी पुढे अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध तज्ज्ञांची तातडीने बैठक घेण्याचीही मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचा सखोल आढावा घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करूनच पुढील निर्णय घ्यावेत, असेही त्यांनी सुचवले. देशातील जनतेमध्ये विश्वास, स्थैर्य आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हेच सध्याच्या परिस्थितीत केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी ठाम भूमिका शरद पवार यांनी मांडली. शरद पवार यांनी केलेली पोस्ट देखील पहा…. मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी (
@narendramodi) यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविणे देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासोबतच प्रधानमंत्र्यांनी देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा. देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणे, यालाच सद्यस्थितीत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे. सुरूवात स्वत:पासून केली पाहिजे – बाळासाहेब थोरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काटकसरीचे आवाहन केले आहे याबद्दल अगोदरच राहुल गांधी यांनी सांगितले होते. निवडणुकीच्या काळात प्रचंड धुमाकुळ केला. प्रचंड इंधन वापरले आणि आता हे काटकसर सांगत आहेत. हे काही बरोबर नाही, सुरूवात स्वत:पासून केली पाहिजे, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed