अमरावती 45.4 अंश सेल्सिअसवर, उष्णतेचा 'येलो अलर्ट':16 मे पर्यंत तापमान वाढण्याची शक्यता, नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन

0
d3c6abb9-94dc-4e20-8c94-6afc1b0fc5ae_1778597547168.jpg




अमरावतीमध्ये तापमानाने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. आज शहराचे तापमान ४५.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने अमरावती जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला असून, १६ मे पर्यंत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या पंधरवड्यात अमरावतीचे तापमान ४३ ते ४६ अंश सेल्सिअस दरम्यान होते, तर यापूर्वी ४६.७ अंश सेल्सिअसचा विक्रमी तापमानाची नोंद झाली होती. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता, परंतु आता पाऊस थांबल्याने उकाडा प्रचंड वाढला आहे. स्थानिक हवामानतज्ज्ञ प्रा. अनिल बंड यांच्या मते, या काळात अमरावती जिल्ह्याचे तापमान ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. उन्हात वाहने चालवणे शक्यतो टाळावे आणि ज्वलनशील पदार्थांपासून दूर राहावे. पशुधन तसेच पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवावे आणि त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे. तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उष्माघाताची चिन्हे ओळखावीत. चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, असा सल्लाही जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आगामी चार दिवस अमरावतीसह विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने २१ एप्रिलपासून शाळांच्या वेळा बदलल्या आहेत. परीक्षा आणि निकालाशी संबंधित कामे सकाळी ७ ते १० या वेळेतच करावीत, असे आदेशात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed