एकदम पहिल्यासारखी परिस्थिती होणे कठीण:छगन भुजबळांचे इंधन तुटवड्यावर भाष्य; युद्धामुळे जगभरात संभ्रमावस्था असल्याचा दावा

0
image-resize-color-correction-and-ai-2026-05-12t12_1778570713.png




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसरीचे आवाहन केल्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही त्याचा पुनरुच्चार केला आहे. इराण – अमेरिका युद्धामुळे जगभरात इंधन तुटवडा निर्माण झाला आहे. इतर देशांचा अभ्यास केला तर त्या देशांत यापूर्वीच मोठी दरवाढ झाली आहे. त्या तुलनेत आपला देश अत्यंत मजबुतीने उभा आहे. पण एकदम पहिल्यासारखी परिस्थिती होणे कठीण आहे, असे ते म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. आपल्याकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत. त्यामुळे सध्याच्या जागतिकि संकटाचा भारतावर अधिक परिणाम होत आहे. त्यामुळे आपण स्वयंपाकाचे तेल, पेट्रोल, डिझेल, गॅस आदींचा कमी वापर केला पाहिजे. यावर उपाय म्हणून ज्या शहरांत मेट्रो आहे, तेथील लोकांनी मेट्रोचा वापर करावा. बैठकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व वर्क फ्रॉम होम सारख्या पर्यायांचा वापर करावा, असे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी उपरोक्त विधान केले आहे. काय म्हणाले मंत्री छगन भुजबळ? छगन भुजबळ आज पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, आपण सर्वच देशांचा अभ्यास केला, माहिती घेतली तर त्या देशांत यापूर्वीच कितीतरी पटीने पेट्रोल – डिझेल व इतर इंधनांची दरवाढ झाली आहे. हे सर्व तुम्हीच रिपोर्टिंग करता. मी स्वतःही ते पाहतो. याऊलट आपला देश आतापर्यंत बराचसा मजबुतीने उभा आहे. याचे कारण असे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पूर्वी आयात केल्या जाणाऱ्या 27 देशांच्या तुलनेत आता 45-50 देशांकडून आयात सुरू केली आहे. त्यातून आपला टिकाव लागला आहे. त्यानंतरही एकदम पहिल्यासारखी परिस्थिती होणे कठीण आहे. पण इतरांपेक्षा आपले चांगले आहे असे निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल. सध्याच्या परिस्थितीमुळे पाकिस्तान, बांगलादेशापासून जपानपर्यंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. पुढचे काही दिवसांत इराण – अमेरिकेतील युद्ध थांबणार आहे की, नाही हे अद्याप स्पष्ट नाही. हे युद्ध थांबल्यासारखे वाटते आणि पुन्हा सुरू होते. या स्थितीमुळे संपूर्ण जगात एक संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्व देशांनी स्वतःहून सावरणे गरजेचे आहे, असे छगन भुजबळ म्हणाले. राज्यात इंधनाचा तुटवडा नाही उल्लेखनीय बाब म्हणजे छगन भुजबळ यांनी यापूर्वीच राज्यात पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले होते. सरकारने एलपीजी गॅसच्या पुरवठ्याचा काळाबाजार रोखण्यासाठी पथके नेमली आहेत. ही पथके कुठेही काळाबाजार आढळला तर त्यावर कारवाई करतील. केंद्राने शिल्लक गॅसचे वाटप करण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे या प्रकरणी सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. गरजेनुसार, केरोसिन वितरण करण्याची बाबही या प्रकरणी सरकारच्या विचाराधीन आहे. प्रत्येक जिल्ह्यात केरोसीनची वाहतूक, साठवणूक व वितरण व्यवस्था कशी करता येईल याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आली आहे. सध्या केरोसीनचा दर 61 रुपये प्रति लीटर आहे. एलपीजीला पर्याय म्हणून कोळसा व रॉकेल यांचा वापर करता येईल, असे भुजबळ म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *