विरोधी खासदारांना विकास निधी नाकारल्यास काँग्रेसचा सविनय कायदेभंग आंदोलनाचा इशारा:निधी मिळत नव्हता हे सांगणे म्हणजे सरकारचीच पोलखोल- गोपाळ तिवारी




महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सत्ताधारी भाजप-महायुतीवर गंभीर आरोप केला आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये विकास निधी अडवून सूडबुद्धीचे राजकारण केले जात असल्याचे त्यांनी म्हटले. ही वागणूक अशीच सुरू राहिल्यास महाराष्ट्रातील जनता ‘सविनय कायदेभंग’ आणि ‘असहकार आंदोलन’ पुकारण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा तिवारी यांनी दिला आहे. तिवारी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना म्हटले की, महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर विश्वास ठेवून जनतेने ज्या खासदारांना निवडून दिले, त्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश करणे हा मतदारांशी केलेला विश्वासघात आहे. हे खासदार पक्षबदलाचे समर्थन करताना ‘विकास निधी मिळत नव्हता आणि कामे खोळंबली होती’ असे कारण देत आहेत. हा प्रकार म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या कारभाराची पोलखोल असून, विरोधी पक्षाला मतदान करणाऱ्या जनतेवर सूड उगवण्याचा प्रयत्न आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेचा उल्लेख करत तिवारी म्हणाले की, प्रत्यक्षात मात्र दुटप्पीपणाची वागणूक दिली जात आहे. लोकशाहीत जनतेने निवडणुकीद्वारे विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना कौल दिला, जेणेकरून ते सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर अंकुश ठेवू शकतील. मात्र, अशा मतदारसंघांचा निधी रोखून लोकशाही मूल्यांची पायमल्ली केली जात आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला 31 जागांवर, तर भाजप-एनडीएला 17 जागांवर विजय मिळवून दिला. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या वाट्याचा विकास निधी रोखणे हा देशात सर्वाधिक राष्ट्रीय महसूल व जीएसटी देणाऱ्या महाराष्ट्राचा अपमान आहे. जर महाराष्ट्राच्या जनतेला अशी वागणूक दिली जात असेल, तर जनता सरकारी कर न भरण्याची भूमिका घेऊन सविनय कायदेभंग व असहकार आंदोलन पुकारेल, असा इशारा तिवारी यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *