जि.प.च्या 44 अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन:बदलीनंतरही जनगणना जबाबदारी पार पाडण्याचे निर्देश
![]()
जिल्हा परिषद अमरावतीच्या शिक्षण विभागामार्फत अतिरिक्त विषय शिक्षक समायोजन प्रक्रिया जिल्हा परिषदेमधील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांध यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आलेल्या या प्रक्रियेअंती ४५ पैकी ४४ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. ही प्रक्रिया नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध वातावरणात पुढे गेली. या समायोजन प्रक्रियेमध्ये विषय शिक्षक भाषा (मराठी माध्यम) प्रवर्गातील २५ शिक्षक, विषय शिक्षक सामाजिक शास्त्र प्रवर्गातील १८ शिक्षक तसेच विषय शिक्षक सामाजिक शास्त्र (उर्दू विभाग) प्रवर्गातील २ शिक्षकांचा समावेश होता. एकूण ४५ अतिरिक्त शिक्षकांपैकी ४४ शिक्षकांचे यशस्वीपणे समायोजन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांचे मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी हे अभियान पूर्णत्वास नेले.शिक्षकांना स्पष्ट निर्देश देत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सतिश मुगल यांनी सांगितले की, देशाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या जनगणना कार्यात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होता कामा नये. जनगणना कार्यक्रमासाठी कर्तव्य बजावत असलेल्या शिक्षकांनी समायोजनानुसार बदली झालेल्या शाळेत नियमानुसार रुजू व्हावे आणि त्यानंतर जनगणनेचे काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मूळ शाळेत उपस्थित राहून जबाबदारी पार पाडावी.समायोजन प्रक्रियेदरम्यान शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी आवश्यक समन्वय साधत शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सतीश मुगल, अधीक्षक नरेंद्र गायकवाड, सहायक प्रशासकीय अधिकारी संजय मुंद्रे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंकज गुल्हाने, वरिष्ठ सहाय्यक विजय मालोकर, शरद चहाकार, कनिष्ठ सहाय्यक संजय वाघमारे तसेच अनिकेत हुरडे उपस्थित होते.
