मनपा शाळेचा विकास करुन गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न:गुणवंतांचे कौतुक करताना महापालिका शिक्षण सभापती ॲड. रेवणे यांचे प्रतिपादन
![]()
महापालिकेच्या शाळांचा विकास करुन गुणवत्ता सुधारण्याचा माझा प्रयत्न असेल, असे सांगतानाच आपण सर्वांनी मला त्यासाठी साथ द्या, असे प्रतिपादन युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकारी तथा मनपा शिक्षण सभापती ॲड. प्रिती रेवणे-बनारसे यांनी केले .
.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर रेवणे यांनी मनपाच्या जमील कॉलनी येथील उर्दु हायस्कुलच्या (इंग्लिश मीडियम) १२ गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेत जाऊन सत्कार केला. यावेळी अध्यक्षस्थानाहून त्या बोलत होत्या. प्रारंभी त्यांच्या हस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या आयेशा समन अब्दुल समद (७३ टक्के), हेमा अजीन अतहर अहमद (६९.३३ टक्के), जवेरीया तसलीम अब्दुल नईम (६३.५० टक्के) या प्रथम तीन विद्यार्थीनींचा समावेश आहे. या मुलींमुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले असून त्यांना पुष्पगुच्छ व अभिनंदनपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शिक्षण सभापती ॲड. प्रिती रेवणे पुढे म्हणाल्या की, महानगरपालिका शाळांमध्येही विद्यार्थ्यांना उत्तम व गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. मनपा शाळा कोणत्याही बाबतीत कमी नसून विद्यार्थ्यांच्या निकालातून ते स्पष्ट दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्याच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. भविष्यातही मनपा शाळांचा अधिकाधिक विकास करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापक सईद, मनपा शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, शिक्षक वृंद, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
