संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही:संतांकडे वाकड्या नजरेने पाहिले तर कार्यक्रमच होणार, नितेश राणेंचा इशारा
![]()
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांच्यावर शनिवारी शाई फेकण्याचा प्रकार घडला होता. संग्राम भंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून लवांडे यांच्यावर शाई फेकली होती. त्यानंतर अनेकांनी या घटनेचा निषेध केला. लवांडे वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर शाइफेक करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यावर आता भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे राणे यांनी म्हटले आहे. नितेश राणे म्हणाले, या महाराष्ट्रात मोठी संत परंपरा आहे, वारकरी परंपरा आहे. आमच्या संत आणि महाराजांकडे कोणीही वाकड्या नजरेने बघत असेल तर त्या सगळ्यांचे कार्यक्रमच होणार, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. मला जशी ही बातमी समजली, मी बापूंना फोन केला आणि म्हटले की बापू चिंता करू नका, तुमचे सगळे भाऊ मंत्रालयात बसलेले आहेत. तुमच्या केसलाही धक्का लागणार नाही, हा मी बापूला शब्द देऊन टाकला. माझ्या नावाने शिव्या घालत असतील, मला काहीही फरक पडत नाही, असे राणे यांनी म्हटले आहे. माझ्यावरील हल्ल्याचे सूत्रधार नितेश राणे- विकास लवांडे नितेश राणे यांच्या या विधानानंतर विकास लवांडे यांनी देखील पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, माझ्यावर काल जो जीवघेणा हल्ला झाला, त्या संदर्भात फिर्याद देण्यात आली आहे, तरी देखील आरोपींना अटक झालेली नाही, त्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या नाहीत, त्यांचे पिस्तूल जप्त करण्यात आले नाही. कारण या घटनेचे सूत्रधार आज बोलले आहेत, असे म्हणत त्यांनी राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस याची दखल घेतील का? पुढे बोलताना विकास लवांडे म्हणाले, संग्राम भांडारे हे प्यादा असावे आणि या घटनेचे सूत्रधार हे नितेश राणे असावेत. आता जर सरकारमधला मंत्रीच या हल्ल्याचा सूत्रधार असेल तर कोण कोणावर गुन्हा दाखल करणार आणि कोणाला अटक होणार असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो. पोलिसांचे हात बांधलेले असावेत असे मला वाटते. आणि नितेश राणे याचे सूत्रधार आहेत. देवेंद्र फडणवीस याची दखल घेतील का? की त्यांना पाठिंबा देणार? असा सवाल लवांडे यांनी उपस्थित केला आहे.
