देशात पाण्याची कमतरता नाही, नियोजनाचा अभाव:नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत; म्हणाले- पॉवर ग्रीडप्रमाणे वॉटर ग्रीडही आवश्यक
![]()
देशात पाण्याची कमतरता नाही, तर आपल्यामध्ये पाण्याबद्दलच्या नियोजनाचा अभाव असल्याची खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्त नागपूर येथे जलसंवाद आणि जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी गडकरी यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्या आणि पाण्याच्या टंचाईबाबत भाष्य केले आहे. नितीन गडकरी म्हणाले, विदर्भात शेतकरी आत्महत्या पाण्याच्या कमतरतेमुळे होत आहे. देशातील काही भागात मुबलक पाणी आहे, तर काही भागात दुष्काळ सारखी परिस्थिती आहे. किंबहुना, देशात पाण्याची कमतरता नाही, तर आपल्यामध्ये पाण्याबद्दलच्या नियोजनाचा अभाव आहे. ‘वॉटर ग्रीड’ करणे आवश्यक पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, देशात जशी हायवे ग्रीड आहे, पॉवर ग्रीड आहे, त्याच पद्धतीने ‘वॉटर ग्रीड’ करणे ही आवश्यक आहे. जिथे पूर येतात तिथून मोठे कॅनल करून पाणी दुर्भिक्ष्य असलेल्या भागात आणण्याची गरज आहे. त्यासाठीचे मोठे प्रकल्प सरकारने करावे, मतदारसंघ पातळीवर लोकप्रतिनिधींनी त्यांच्या पातळीवर काम करावे, तर गावांनी त्यांच्या पातळीवर जलसंधारणला लोकांची चळवळ बनवावे. लाखो प्रयत्न होतील, तेव्हा पाण्याच्या दुर्भिक्षाचे प्रश्न सुटेल, अशी आशा गडकरी यांनी व्यक्त केली आहे. साडे तीनशे पेक्षा जास्त तलाव बांधून दिले पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्था गेले 25 वर्ष या क्षेत्रात काम करत आहे. आम्ही पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला साडे तीनशे पेक्षा जास्त तलाव बांधून दिले. त्यामुळे त्यांच्या सिंचित शेतीचे प्रमाण वाढले. तसेच अवतीभोवतीच्या गावांमध्येही भूजल पातळी वाढली. त्या तलावाची खोदलेली माती आम्ही रस्ते निर्मितीसाठी वापरली. बुलढाणामध्ये ही अशाच पद्धतीचा पॅटर्न वापरून जलसंधारणाचे काम झाले. रस्ते निर्मितीसाठी मातीही उपलब्ध झाली, आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. जलसंवाद आणि जलक्रांती परिषद आयोजित दरम्यान, मागील 25 वर्षात पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेने विदर्भात भक्कम काम केले आहे. 17 मे आणि 18 मे रोजी जलसंवाद आणि जलक्रांती परिषद आयोजित केली आहे. यामध्ये नाना पाटेकर, आमिर खान, मकरंद अनासपुरे या अभिनेत्यांसह जलसंधारण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे देशभरातील तज्ञ सहभागी होणार आहेत.
