सुप्रिया सुळेंच्या अपघातावर सुनील मानेंकडून संशय:ज्यांचा अपघात झाला त्यांना शंका आली तर नक्कीच चौकशी होईल, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया
![]()
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला शनिवारी रात्री अपघात झाला. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. या अपघातावर शरद पवार गटाच्या सुनील माने यांनी शंका व्यक्त केली गेली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी यावर भाष्य करताना सुप्रिया सुळेंना चौकशीची गरज वाटली तर त्या त्याची मागणी करतील असे स्पष्ट केले आहे. सुनील माने म्हणाले, आमचे असे म्हणणे आहे की अजितदादांचा घातपात करण्यात आला, त्याच पद्धतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया ताई सुळे यांच्या गाडीला गुजरातमधल्या एका गाडीने अतिशय भयानक पद्धतीने टक्कर दिली आहे. महाराष्ट्रातल्या त्या महत्त्वाच्या आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत. या पद्धतीने त्यांना जर काही बरे-वाईट करण्याचा हा प्रयत्न होता का, अशी शंका आमच्या मनात आहे. या प्रकरणी राज्य सरकारने चौकशी केली पाहिजे, अशी मागणी माने यांनी केली आहे. सुप्रिया सुळेंना शंका वाटली तर चौकशीची मागणी करतील सुनील माने यांनी उपस्थित केलेल्या शंकेवर शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, काल सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात झाला, एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर सुद्धा चार दिवसांपूर्वी भरकटले होते. काल सुप्रिया सुळे यांच्या गाडीला धक्का लागला. आता ते सुदैव की दुर्दैव ती गाडी गुजरातची होती. आता यात ज्यांच्या गाडीला अपघात झाला, त्या गाडीतल्या लोकांनी जर तक्रार केली असती तर चौकशी तर होईलच. सुप्रिया सुळे तेवढ्या सक्षम आहेत आणि त्यांना थोडी जरी शंका वाटली तर त्या चौकशीची मागणी करतील. अंजली दमानिया मीडिया ट्रायल करतायत अंजली दमानिया यांनी रुपाली चकांकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरही संजय शिरसाट म्हणाले, अंजली दमानिया यांच्याकडे पोलिस यंत्रानेपेक्षा फास्ट यंत्रणा आहे. सरकारने स्पष्ट भूमिका घेतली आहे की ज्यांची नावे त्यात येतील त्या सर्वांची चौकशी केली जाईल. सरकारला सगळे माहीत आहे आणि सरकार याकडे गांभीर्याने पाहत आहे. ज्या पद्धतीने मीडिया ट्रायल करण्याचा प्रयत्न दमानिया करत आहेत, एकनाथ शिंदेंचे नाव घेऊन काय करणार आहेत ते? त्यांना हायलाईट होण्यासाठी त्यांच्या नावाचा वापर करत आहेत, अशी टीका शिरसाट यांनी केली आहे. काय म्हणाल्या अंजली दमानिया? भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना वाचवण्याचा मोठा प्रयत्न झाला. खासदार सुनील तटकरे यांनी चौकशी होऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले ते ढाल म्हणून त्यांच्या समोर उभे होते, पण मी डीजींना पत्र पाठवले होते की सर्वांची चौकशी झालीच पाहिजे, त्यामुळेच रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले. तसेच त्यांची चौकशी वकील न घेता करण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
