साहेब… मुलगी पास झाली हो… तिला ३५% पडले… – VastavNEWSLive.com
तिकडून एका वडिलांचा थरथरता पण आनंदाने भरलेला आवाज आला…
“आहो साहेब… माझी मुलगी पास झाली… तिला ३५% पडले…”
क्षणभर मीही शांत झालो…
त्या वडिलांच्या आवाजातला आनंद शब्दांच्या पलीकडचा होता.
माझ्याही चेहऱ्यावर नकळत हास्य उमटलं…
मी त्या वडिलांचं अभिनंदन केलं आणि म्हणालो,
“मी स्वतः गावात येऊन मुलीला पेढे देऊन अभिनंदन करणार…”
कारण त्या ३५% मागे फक्त गुण नव्हते…
तर एका मुलीचं आयुष्य उभं राहिलं होतं…
एका वडिलांची जिद्द होती…
आणि शिक्षणाकडे पुन्हा वळलेलं एक कोवळं मन होतं…
मी वनरक्षक म्हणून नांदेड वनविभागात कंधार तालुक्यात कार्यरत असताना एका रात्री परिसरात बिबट दिसल्याची अफवा मोठ्या प्रमाणात पसरली होती.
नंदनवन शेतशिवारातून अनेक फोन येत होते.
रात्र खूप झाल्यामुळे शोधमोहीम थांबवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शोध सुरू केला.
एका महिलेने मोठ्या पराठीच्या शेताकडे बोट दाखवत सांगितलं,
“आवाज इकडून येतोय…”
आम्ही अत्यंत सावधपणे पुढे गेलो.
परंतु तिथे बिबट नव्हता…
एक रानडुक्कर आपल्या पिलांसोबत होती. माणसांची चाहूल लागताच ती मोठ्याने आवाज करत होती.
अफवा खोटी असल्याचं स्पष्ट झालं.
काम संपलं…
मी जवळच्या एका भोकराच्या झाडाखाली सावलीत बसलो.
तेवढ्यात माझं लक्ष बाजूच्या हळदीच्या शेताकडे गेलं…
एक साधारण नववी-दहावीतली मुलगी उन्हात हळदीला पाणी देत होती.
मी जवळच्या व्यक्तीकडे तिच्याबद्दल विचारलं.
त्यांनी तिच्या वडिलांना आणि त्या मुलीला बोलावलं.
मी विचारलं,
“शाळा सुरू असताना तू शेतात काय करतेस?”
वडील शांतपणे म्हणाले,
“साहेब… ही माझी मुलगी. शाळेत जात नाही. हिचं मन शेतीतच रमलंय. घरची सगळी शेतीची कामं हीच करते…”
मी त्या मुलीकडे पाहिलं.
ती डोळे खाली घालून म्हणाली,
“मला अभ्यास जमत नाही… अधूनमधून शाळेत गेल्यावर अभ्यास मागे राहतो… मुलं हसतात… म्हणून मी शाळेत जात नाही…”
त्या निरागस शब्दांनी मन सुन्न झालं…
एक मुलगी…
जिच्या हातात पुस्तकं असायला हवी होती…
ती लहान वयात शेतात अवजड कामं करत होती…
त्या दिवशी मी जवळपास दोन तास त्या वडिलांशी आणि मुलीशी शिक्षणाबद्दल बोलत राहिलो.
मी वडिलांना विनंती केली,
“आजपासून मुलीला शेतात कामाला लावू नका…
तिला शाळेत जाऊ द्या…
शिक्षण हेच तिचं खरं आयुष्य बदलणार आहे…”
वडील म्हणाले,
“साहेब… जर ही शिकणार असेल तर मी तिला कधीच शेतात कामाला लावणार नाही…”
मुलीचं मनही त्या दिवशी हललं होतं…
ती म्हणाली,
मी अभ्यास करेन… आणि दहावी पास होऊन दाखवेन…
त्या दिवशी एका भोकराच्या झाडाखाली फक्त संवाद झाला नव्हता…
तर एका मुलीच्या आयुष्याला नवं वळण मिळालं होतं…
त्यानंतर मी त्या गावातील एका व्यक्तीमार्फत सतत चौकशी करत राहिलो.
मुलगी शाळेत जाते का…?
वडील पुन्हा शेतात कामाला पाठवतात का…?
आणि हळूहळू बातम्या यायला लागल्या…
साहेब… मुलगी आता रोज शाळेत जाते…
साहेब… वडील आता तिला शेतात पाठवत नाहीत…
हे ऐकून मनाला समाधान मिळत होतं.
आणि आज…
त्या मुलीने कॉपीमुक्त वातावरणात स्वतःच्या मेहनतीवर दहावी उत्तीर्ण होऊन दाखवलं…
कुणाला ३५% कमी वाटतील…
परंतु ज्यांनी संघर्ष जवळून पाहिला आहे त्यांना माहिती आहे —
हे ३५% म्हणजे एका मुलीच्या आत्मविश्वासाचा विजय आहे…
शाळाबाह्य आयुष्यातून शिक्षणाच्या प्रवाहात परत येण्याचा विजय आहे…
एका बापाच्या बदललेल्या विचारांचा विजय आहे…
आज ती मुलगी फक्त पास झालेली नाही…
तर ती स्वतःवर विश्वास ठेवायला शिकली आहे.
समाजात अजूनही अनेक मुली आहेत…
ज्यांच्या हातात वहीऐवजी विळा आहे…
ज्यांच्या डोळ्यांत स्वप्नं आहेत पण परिस्थिती त्यांना शाळेपासून दूर नेत आहे…
काही मुली अभ्यासात मागे पडतात…
काहींची चेष्टा होते…
काहींना घरची जबाबदारी थांबवते…
पण प्रत्येक मुलीमध्ये क्षमता आहे…
फक्त तिला कुणीतरी समजून घेणारं मन हवं…
थोडासा आधार हवा…
थोडी प्रेरणा हवी…
आणि विश्वास हवा की —
तू करू शकतेस…
त्या मुलीचे आणि तिच्या वडिलांचे मनापासून अभिनंदन…
कारण त्यांनी परिस्थितीसमोर हार मानली नाही.
आज त्या मुलीने ३५% मिळवले…
उद्या ती अधिकारी सुद्धा होऊ शकते…
कारण गुणांपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे —
स्वतःवरचा विश्वास आणि पुन्हा उभं राहण्याची हिंमत…
ही कथा प्रत्येक शाळाबाह्य मुलीपर्यंत पोहोचली पाहिजे…
जेणेकरून प्रत्येक मुलगी स्वतःला म्हणेल —
मीही शिकेन…
मीही उभी राहीन…
आणि माझं भविष्य मी स्वतः घडवेन…
शिवसांब घोडके
वनरक्षक वनविभाग नांदेड
