TCS धर्मांतर प्रकरणावरून राजकारण तापले:धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा आरोप

0
new-project-2026-05-09t165607855_1778326010.jpg




नाशिकच्या टीसीएस (TCS) कंपनीतील कथित अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला अटक झाल्यानंतर आता या प्रकरणाला तीव्र राजकीय वळण मिळाले आहे. निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या एमआयएम (MIM) नगरसेवकावरून सत्ताधारी भाजप आणि शिंदेसेना आक्रमक झाली असतानाच, काँग्रेसने या संपूर्ण प्रकरणाला ‘भाजपचा राजकीय डाव’ संबोधले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल असलेली निदा खान ही अनेक दिवसांपासून फरार होती. पोलिसांनी तिला ७ मे रोजी छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव, कैसर कॉलनी येथील एका फ्लॅटमधून अटक केली. निदा खान आपल्या कुटुंबीयांसह येथे लपून बसली होती. या तपासात एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याने तिला लपण्यास मदत केल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यावरून भाजप आणि शिंदेसेनेने मतीन पटेल आणि एमआयएम विरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. हा भाजपचा ‘धार्मिक ध्रुवीकरणा’चा खेळ: हर्षवर्धन सपकाळ या प्रकरणावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकार आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “निदा खान प्रकरणाच्या माध्यमातून भाजप राज्यात धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणातील एफआयआर (FIR) अद्याप सार्वजनिक का करण्यात आलेला नाही? तो तात्काळ जनतेसमोर आणावा,” अशी मागणी सपकाळ यांनी केली. ते पुढे म्हणाले की, “इतके दिवस पोलीस काय करत होते? या प्रकरणाला केवळ निवडणुकीच्या राजकारणासाठी हवा दिली जात आहे का, हे स्पष्ट झाले पाहिजे. ‘मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे करतो’ हा राजकीय तमाशा आता थांबला पाहिजे.” विकास लवांडे यांच्यावरील शाईफेकचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईहल्ल्याचाही हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र शब्दात निषेध केला. “हा हल्ला वारकरी संप्रदायाच्या विचारांचा अपमान आहे. हल्लेखोर हे वारकरी नसून त्यांना भाजप सरकारचे संरक्षण लाभले आहे,” असा आरोप त्यांनी केला. ‘मनुवादी’ विचारांचा फटका समाजाला हर्षवर्धन सपकाळ यांनी या हल्ल्याचा संबंध ऐतिहासिक संघर्षाशी जोडला. ते म्हणाले की, “विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात मनुवादी विचार वाढत असल्याची भीती व्यक्त केली होती, ती या हल्ल्याने खरी ठरली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत तुकाराम महाराज यांना ज्या प्रवृत्तींनी छळले, तोच ‘मनुवादी’ विचार आज भाजप आणि संघाच्या माध्यमातून पुन्हा डोकं वर काढत आहे. दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी यांनाही याच विचाराने लक्ष्य केले होते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed