भारत अन् बांगलादेशाला जोडणारा सांस्कृतिक धागा धर्मापेक्षाही बळकट:बांगलादेशातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राह नवकुमार यांचे मत‎

0
253_177815676169fc84d9eb986_1002630956.jpg




भारत आणि बांगलादेश हे दोन स्वतंत्र देश असले तरी हजारो वर्षांपासूनची भारतीय संस्कृती हा दोन्ही देशांना जोडणारा सर्वात मोठा दुवा आहे. हा धागा धर्मापेक्षाही जास्त बळकट आहे. मात्र, सध्या दोन्ही देशात धर्मावर आधारित द्वेष आणि हिंसा वाढू लागल्याने उपखंडातील संस्कृतीचे विघटन होत आहे, असे परखड मत बांगलादेशातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राह नवकुमार यांनी व्यक्त केले. स्नेहालय, पेमराज सारडा महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभाग आणि राजमुद्रा करिअर अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “राजकीय क्रांतिनंतरचा बांगलादेश” या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी बांगलादेशातील मानवाधिकार कार्यकर्त्या तंद्रा बारुआ आणि दक्षिण अमेरिका शांती अभियानाच्या प्रमुख यांचीही उपस्थिती होती. नवकुमार म्हणाले, मागील २० महिन्यांपासून बांगलादेश एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. भारतात घडणाऱ्या अनेक घटनांच्या प्रतिक्रिया बांगलादेशातील हिंदू, बौद्ध आणि अन्य अल्पसंख्याकांना सोसाव्या लागतात. दोन देशांतील ४००० किमीची सीमारेषा केवळ भूभागाची नसून ती नागरिकांच्या आपुलकीची आहे. शासनाच्या स्तरावर प्रयत्न झाले तर भारतीय उपखंडातील जागतिक महासत्तांचा हस्तक्षेप रोखता येईल. या कार्यक्रमात प्रा. नंदा पांडुळे, ॲड. शाम असावा, अजिनाथ रायकर, डॉ. महेश मुळे, डॉ. ज्योती बीडलान यांच्यासह अनेक मान्यवरांनी चर्चेत सहभाग घेतला. हनीफ शेख यांनी प्रास्ताविक केले, तर विकास सुतार यांनी आभार मानले. नोव्हेंबर २०२६ मध्ये पुन्हा सायकल यात्रा स्नेहालय संस्थेने राबवलेल्या भारत-बांगलादेश सद्भावना सायकल यात्रेमुळे तरुणांमधील सांस्कृतिक बंध मजबूत झाले आहेत. हाच धागा पुढे नेण्यासाठी नोव्हेंबर २०२६ पासून पुन्हा एकदा सायकल यात्रा आणि युवा संमेलनांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती नवकुमार यांनी यावेळी बोलताना दिली. कठीण काळातही गांधी विचार अभेद्य बांगलादेशातील संघर्षाच्या काळात शेख मुजीबूर रहमान यांचे पुतळे आणि घरे उद्ध्वस्त झाली, मात्र महात्मा गांधीजींनी स्थापन केलेल्या गांधी आश्रमाला कोणाही धक्का लावला नाही. “१९४६ मध्ये गांधीजींनी ज्या गावांना भेटी दिल्या होत्या, तेथील सामाजिक ऐक्य आजही अभेद्य आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी गांधी आश्रमाच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली, हे गांधी विचारांचे यश आहे,” असेही नवकुमार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed