डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू कलिंगडामुळे नाहीच!:उंदीर मारण्याच्या औषधामुळे; फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक खुलासा
![]()
मुंबईतील पायधूनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या संशयास्पद मृत्यूचा छडा 11 दिवसांनंतर लागला असून, याप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या चौघांचा मृत्यू कलिंगड खाल्ल्याने नाही, तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. फॉरेन्सिक अहवालात मृत व्यक्तींच्या शरीरात आणि त्यांनी खाल्लेल्या कलिंगडाच्या नमुन्यांमध्येही ‘झिंक फॉस्फाईड’ या घातक रसायनाचे अंश आढळल्याने वैद्यकीय आणि पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ही दुर्दैवी घटना 26 एप्रिल रोजी घडली होती, ज्यामध्ये 44 वर्षीय अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन (35), मुलगी आयेशा (16) आणि झैनब (13) यांचा अवघ्या काही तासांच्या अंतरात मृत्यू झाला होता. या कुटुंबाने रात्री कलिंगड खाल्ले होते, त्यामुळे सुरुवातीला कलिंगडामुळे विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता उंदीर मारण्याच्या औषधामुळेच या संपूर्ण कुटुंबाचा अंत झाल्याचे स्पष्ट झाले असून, हे औषध कलिंगडात कसे आले, याचा अधिक तपास पोलिस करत आहेत. मुंबईतील पायधुणी येथील एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूचे गूढ अखेर उलगडले असून, कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालानुसार या चौघांच्याही शरीरात ‘झिंक फॉस्फाईड’ या उंदीर मारण्याच्या औषधाचे अंश आढळले आहेत. सुरुवातीला कलिंगडामुळे विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता, मात्र तपासणीत कलिंगडात कोणतीही भेसळ आढळली नसून या घातक रसायनामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विषबाधेनंतर उलट्यांचा त्रास सुरू झाल्यावर या कुटुंबाने डॉक्टरांकडे धाव घेतली होती, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. आता हे विष त्यांच्या शरीरात नेमके कसे पोहोचले, ही आत्महत्या आहे की त्यांना विष देऊन मारण्यात आले आहे, या दिशेने पोलिस अधिक तपास करत आहेत. नेमकी घटना काय आहे? 25 एप्रिल रोजी रात्री कलिंगड खाल्ल्यानंतर डोकाडिया कुटुंबातील चौघांना उलट्या, चक्कर आणि पोटदुखीचा तीव्र त्रास सुरू झाला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांची प्रकृती अधिकच खालावली. दोन्ही मुली बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला तातडीने जेजे रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दुर्दैवाने तेथे दोन्ही मुलींना मृत घोषित करण्यात आले आणि त्यानंतर काही तासांच्या अंतराने पालकांचाही मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील चारही सदस्यांचा अवघ्या काही तासांच्या फरकाने अशा प्रकारे करुण अंत झाल्याने या संपूर्ण घटनेबाबत आता परिसरात मोठी खळबळ उडाली असून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
