सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीत चुरस:'राज्यसभेसाठी माझा आग्रह नाही', खासदारकीच्या चर्चेवर छगन भुजबळांचे मोठे विधान
![]()
सुनेत्रा पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून पक्षात हालचालींना वेग आला आहे. या जागेसाठी ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत होते, मात्र त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. छगन भुजबळ म्हणाले की, मी सध्या राज्यात ज्येष्ठ मंत्री म्हणून काम पाहत आहे. माझ्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी असल्याने राज्यसभेवर जाण्यासाठी आग्रह धरणे चुकीचे आहे. या जागेबाबत अद्याप पक्षात कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही. पक्ष जो निर्णय घेईल, तो अंतिम असेल. पक्ष कोणाला संधी देणार? राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कोणाला संधी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी या जागेसाठी रस दाखवल्याने राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत स्पर्धा वाढल्याचे चित्र दिसत आहे. राज्यसभेच्या जागेसोबतच पक्षातील इतर महत्त्वाच्या रिक्त पदांवरही लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई प्रदेशाध्यक्ष निवडीचेही मोठे आव्हान राज्यसभेच्या या रिक्त जागेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेससमोर मुंबई प्रदेशाध्यक्ष निवडीचेही मोठे आव्हान आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून हे पद रिक्तच आहे. त्यामुळे आता राज्यसभा आणि मुंबई अध्यक्षपद या दोन्ही महत्त्वाच्या नियुक्त्या एकाच वेळी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या नियुक्त्यांमुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि आगामी राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. नेतृत्व कोणत्या नेत्यावर विश्वास दाखवणार सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन खासदार उरले आहेत. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार आणि नितीन पाटील यांचा समावेश आहे. प्रफुल्ल पटेल यांचा कार्यकाळ 2030 पर्यंत असून नितीन पाटील यांची मुदत 2028 पर्यंत आहे. तर नुकतेच राज्यसभेवर निवडून गेलेले पार्थ पवार 2032 पर्यंत खासदार राहणार आहेत. आता सुनेत्रा पवार यांच्या जागी पक्ष नेतृत्व कोणत्या नेत्यावर विश्वास दाखवणार आणि संघटनात्मक पातळीवर कोणते बदल करणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
