पुण्यात लग्नास नकार देताच प्रियकराने चिरला प्रेयसीचा गळा:मृत्यूच्या दाढेतून तरुणीचा भावाला VIDEO कॉल; नागपुरात इन्स्टाग्राम 'प्रेम त्रिकोणा'तून 17 वर्षीय मुलाची क्रूर हत्या
![]()
विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात पुन्हा एकदा नात्यातील क्रूरता समोर आली आहे. चंदननगर परिसरातील पठारे वस्तीमध्ये एका माथेफिरू प्रियकराने आपल्याच प्रेयसीवर घरात घुसून प्राणघातक हल्ला केला. लग्नाचे बोलणे फिस्कटल्याच्या रागातून हा रक्ताचा खेळ खेळला गेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सध्या पीडितेची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी तातडीने तपासचक्रं फिरवून आरोपी दिलीप राठोडला बेड्या ठोकल्यात. नसरापूर येथे लहान मुलीवर झालेला अनन्वीत अत्याचार आणि तिच्या निर्घृण हत्याकांडानंतर हा नवीन प्रकार समोर आलाय. त्यामुळे पुन्हा एकदा लोकांचा थरकाप उडालाय. नेमके काय घडले? आरोपी दिलीप राठोड (२२) आणि पीडित तरुणी एकाच मॉलमध्ये कामाला होते. याच दरम्यान त्यांच्यात ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, तरुणीचे लग्न दुसरीकडे ठरत असल्याचे समजताच दिलीप संतापला होता. घटनेच्या दिवशी तरुणी घरात एकटीच असल्याचे पाहून त्याने थेट तिच्या घरात प्रवेश केला. शब्दाला शब्द वाढला आणि रागाच्या भरात दिलीप कडून तिच्या गळ्यावर ब्लेडने सपासप वार करण्यात आले. मृत्यूच्या दाढेतून भावाला व्हिडीओ कॉल हल्ला झाल्यानंतर तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. गळा चिरलेला असल्याने तिला नीट ओरडताही येत नव्हते. अशाही परिस्थितीत तिने कमालीचे धैर्य दाखवत आपल्या भावाला फोन केला. “दादा, मला एका मुलाने मारलंय, गळ्यातून आवाज येत नाहीये, तू लवकर घरी ये…” इतके बोलून तिने भावाला व्हिडीओ कॉल केला. समोर आपली बहीण रक्तबंबाळ अवस्थेत पाहून भावाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने तातडीने धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केले. कागदावर नाव लिहून दिली साक्ष जखमी तरुणीला जेव्हा पोलीस आणि डॉक्टरांनी विचारले की ‘हल्ला कोणी केला?’, तेव्हा जखमेमुळे तिला बोलणे अशक्य होते. तिने केवळ खुणेने कागद आणि पेन मागितला. थरथरत्या हाताने तिने त्या कागदावर आरोपीचे नाव— ‘दिलीप राठोड’ असे लिहिले आणि गुन्हेगाराचा चेहरा समोर आला. पोलिसांची कारवाई घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी तातडीने तपासचक्रं फिरवून आरोपी दिलीप राठोडला बेड्या ठोकल्या आहेत. सध्या पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. इन्स्टाग्रामवरील ‘प्रेम त्रिकोणा’तून’ नागपुरात 17 वर्षीय मुलाची क्रूर हत्या सोशल मीडियाच्या आभासी दुनियेतील आकर्षण जेव्हा टोकाच्या द्वेषात बदलते, तेव्हा त्याचे परिणाम किती भयावह असू शकतात, याचा धक्कादायक अनुभव नागपूरच्या कळमना परिसरात आला आहे. एका अल्पवयीन मुलीच्या प्रेमातून निर्माण झालेल्या वादाने अवघ्या 17 वर्षांच्या जोहरान मुस्तफा शेख या तरुणाचा बळी घेतला आहे. मैत्रीच्या नावाखाली ‘डेथ कॉल’ घटनेची सुरुवात झाली ती सोशल मीडियावरील मैत्रीतून. जोहरान आणि आरोपी अनुराग यादव हे दोघेही एकाच मुलीच्या संपर्कात होते. यातूनच त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते. मंगळवारी रात्री जोहरानला इन्स्टाग्रामवर एक कॉल आला. “मी मित्राला भेटून येतो,” असे घरच्यांना सांगून जोहरान बाहेर पडला. मात्र, तो कॉल प्रत्यक्ष भेटीचा नसून मृत्यूचा सापळा होता, याची पुसटशी कल्पनाही त्याला नव्हती. भरमैदानात रक्ताचा खेळ वाजपेयी नगरातील अशरफी मशिदीजवळ असलेल्या एका मोकळ्या मैदानात जोहरान पोहोचला. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या आरोपीने गाठ घालून त्याच्यावर हल्ला चढवला. अनुरागने धारदार शस्त्राने जोहरानच्या डोक्यावर आणि मानेवर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जोहरानचा आक्रोश रात्रीच्या शांततेत विरून गेला. नागरिकांनी त्याला तातडीने मेयो रुग्णालयात हलवले, मात्र जखमा इतक्या खोल होत्या की उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस तपासाचा वेग या घटनेनंतर कळमना पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोहरानच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी अनुराग यादवच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, प्रेमाच्या त्रिकोणातून हा हत्येचा कट रचला गेल्याचे निष्पन्न झाले आहे. चिंतेची बाब कमी वयातील मुलांमध्ये वाढणारी गुन्हेगारी प्रवृत्ती आणि सोशल मीडियाचा चुकीचा वापर यामुळे उपराजधानी पुन्हा एकदा हादरली आहे. पोलीस सध्या या प्रकरणातील तांत्रिक धागेदोरे (Social Media Chats) तपासत असून फरार आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बीडमध्ये दोन सख्या बहिणींचे अपहरण बीड जिल्ह्यातल्या चकलांबा पोलिसांनी उत्तरप्रदेश-बिहारच्या सीमेवर जावून अपहरण प्रकरणातील दोन सख्या चुलत बहिणींची सुटका केली. ५ एप्रिल रोजी पळवून नेलेल्या या मुलींना आरोपी छत्तीसगडमध्ये नेण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला जेरबंद केले. ५ एप्रिल २०२६ रोजी गेवराई तालुक्यातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले होते. याप्रकरणी विजय महादेव कव्हळे(रा. पळशी, जि. नांदेड)याच्याविरुद्ध चकलांबा पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी या मुलींना घेऊन पसार झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे होते. छत्तीसगडमध्ये पळण्याच्या तयारीत बलिया जिल्ह्यातील सिकंदरपूर परिसरात स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेतला असता, आरोपी विजय कव्हळे पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याच्याकडून दोन्ही मुलींची सुटका करण्यात आली. आरोपी या मुलींना घेऊन छत्तीसगड राज्यात पळून जाण्याच्या तयारीत होता,मात्र त्याआधीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सलग ४ दिवस प्रवास करून ही कामगिरी सपोनि सचिन इंगळे, कल्याण पवार,हनुमान इंगोले आणि शेखर औटेव विकी सुरवसे यांनी पार पाडली. प्रेमाच्या जाळ्यात ओढले दरम्यान, एका मुलीला आरोपीने प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. तिच्यासोबत दुसरी मुलगी केवळआई-वडील रागावतात, मनासारखे वागू देत नाहीत, म्हणून गेली होती. कोवळ्या वयात यादोन्ही मुलींना सुरक्षित परत आणून पोलिसांनी पालकांकडे सोपवले. पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. संशयिताचे मोबाइल लोकेशन आणि सीडीआर यामाध्यमातून पोलिसांनी त्याचा माग काढला. त्या माध्यमातून पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचले. पोलिसांचा भिवंडी ते उत्तरप्रदेशपर्यंत तपास तपासादरम्यान आरोपी पूर्वी भिवंडीत राहत असल्याचे समजले, मात्र तिथे तो सापडला नाही. तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी माग काढला असता, मुली उत्तरप्रदेश-बिहार सीमेवर असल्याचे निष्पन्न झाले. चकलांबा पोलिसांचे पथक तातडीने उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात रवाना झाले.
